• Tue. Mar 10th, 2026
    BMC Elections : पडद्यामागची मोठी बातमी आली! महायुतीच्या 142 जागांचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि भाजपच्या नेत्यांची आज जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक जाहीर केली. यानंतर आता पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या गोटात तर प्रचंड घडामोडी सुरु आहेत. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरु होती. निवडणूक जाहीर होताच दुसऱ्यात दिवशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्र बैठक घेत जागावाटपावर चर्चा केली आहे. या जागावाटपात महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

    मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ताकद आहे. तसेच ठाकरेंचा पक्ष मनसेसोबतही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे अतिशय खेळीमेळीने आणि समजूतदारपणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आजची बैठक पार पडल्याची माहिती आहे. तर जागावाटपावरुन खटके उडणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची देखील या निवडणुकीत बार्गेनिंग पावर बघायला मिळत आहे. आजच्या बैठकीत काय घडलं, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत. पण महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास भाजपने विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत युती करु शकत नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेची महायुती मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहे.

    विशेष म्हणजे मतदान अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलं असल्याने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची आज जागावाटपावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीत भाजपने शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. याबाबत पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पण आजच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत 142 जागांता तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

    शिवसेना आणि भाजपच्या पार पडलेल्या आजच्या बैठकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा देण्याचं ठरलं आहे. पण अद्यापही 85 जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या 85 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आता गुरुवारी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच अंतिम जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार आहेत. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

    पुढच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेल्या जागा आणि काँग्रेसकडे असलेल्या जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक असलेल्या काही जागांवर भाजपने दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम बहुल असलेल्या जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे. ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा या शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. पण तरिही अंतिम जागावाटप ठरल्यानंतर सविस्तर माहिती समोर येईल.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा