समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सिन्नरजवळ एका कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, महाराष्ट्राच्या विकासाची आणि दळणवळणाची गती वाढवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मात्र, हा महामार्ग सध्या त्याच्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे: अपघातांची वाढती संख्या आणि त्यातील बळींची वाढती आकडेवारी. महामार्गावरील वेग, वाहन चालकांचा थकवा, झोपेची डुलकी आणि टायर फुटणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. सहा लेनच्या या प्रशस्त मार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्यात वाहनचालक अपयशी ठरत आहेत, परिणामी अनेकांचा अकाली मृत्यू होत आहे. याच मालिकेतील एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण घटना सिन्नरजवळ नुकतीच घडली आहे, ज्यात विवाह सोहळ्याला जाणाऱ्यांना या भयावह घटनेतून फटका बसला आहे.
Beed News: आई-वडील घरी परतले आणि हादरले, क्षणात सगळं संपलं; 17 वर्षीय मुलीनं स्वत:ला….
सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारानजीक वेगात धावणाऱ्या कियाच्या कारचा अचानक टायर फुटला. टायर फुटताच चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चेंदामेंदा अक्षरशः भूगा झाली.
या कारमधून एकूण ११ जण प्रवास करत होते. त्यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश होता. दुर्दैवाने या अपघातात प्रौढांमधील एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. जखमी झालेल्या मुलांसह इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही जखमींवर सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर अवस्थेतील तिघांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी एका विवाह सोहळ्यासाठी प्रवास करत होते. आनंदाच्या क्षणासाठी निघालेला हा प्रवास क्षणार्धात दुःखात बदलला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अधिक तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणं आणि वाहनांची नियमित तपासणी करणं अत्यावश्यक ठरत आहे.
