मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून महाडच्या दिशेने जाणारी एक भरधाव कार मागून एका कंटेनरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणेही कठीण झाले होते. या भीषण अपघातात सज्जद अब्दुल साखुर सर खोत (वय ५८) आणि त्यांचा मुलगा सज्जत अब्दुल साखुर (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही गोरेगाव तालुक्यातील वणी पुरार येथील रहिवासी होते.
Raigad Crime: संपर्क ठेवला तर 5,000 दंड! अंत्यविधीलाही मनाई; गावकमिटीकडून कुटुंबाचा छळ, बहिष्काराने महाराष्ट्र हादरला
अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस, एस.व्ही.आर.एस. रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला हायड्रॉलिक कटरच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. जखमी सरजीच सजेत खोत (वय २०) याला तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर कार चालवणारा उस्मान अब्दुल हमीद कारविलकर (वय २१, रा. महाड) याला किरकोळ दुखापत झाली होती. त्याला कोलाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.
मृत झालेल्या पिता-पुत्रांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेमागील एक अत्यंत वेदनादायक बाब समोर आली आहे. मृ्त्यू पावलेला मुलगा सज्जत याचे येत्या २९ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. लग्नाची तयारी सुरू असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. वडिलांना घेण्यासाठी हे कुटुंब मुंबई विमानतळावर गेले होते. वडील कतार–दुबई येथे कामासाठी गेले होते. मात्र, मुंबईहून परतताना झालेल्या या अपघाताने सर्व आनंदावर विरजण पडले. काळाने या कुटुंबावर असा घाला घातला की पिता-पुत्रांचा जीव गेला.
या दुर्दैवी घटनेमुळे गोरेगाव परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका आनंदाच्या क्षणी असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
