Satara Drugs Worth Crores of Rupees Seized : साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रँचने छापा टाकून मोठा ड्रगसाठा जप्त केला आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?’
सातारा जिल्ह्यात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केले जात असल्याची बाब समोर आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. सावरी गावातील जनावरांच्या शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती. मुंबई क्राइम ब्रँचने छापा टाकून या ड्रग्ज रॅकेटचा अखेर पर्दाफाश केला. सावरी हे गाव जावळी तालुक्यातील निसर्गरम्य बामणोली परिसरात आहे. पोलिसांनी कारवाई केलेली जागा उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची आहे का? आणि महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?’ असे सवाल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित केले आहेत.
Ahilyanagar News: मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाला हायकोर्टाचा ब्रेक, शनि मंदिराचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे
जनावरांच्या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती
मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतील एका कारवाईत दोन संशयितांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून साताऱ्यातील या ड्रग्ज निर्मितीच्या रॅकेटची माहिती समोर आली. सावरी (ता. जावळी) गावातील एका जनावरांच्या शेडमध्ये एमडी (मेफेड्रोन) आणि अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आज शनिवारी सकाळी छापा टाकला. दिवसभर घटनास्थळी झाडाझडती आणि पंचनामा सुरू होता.
हर्षवर्धन सपकाळांची प्रश्नांची सरबत्ती
दरम्यान, साताऱ्यातील कारवाईनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात नक्की काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना? जादूटोणा सुरु आहे की, आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राइम ब्रँच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे? मुंबई क्राइम ब्रँचला इथे नेमके कोणते घबाड सापडले आहे? इथे नेमकं काय सुरु आहे? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तिथे तातडीने का दाखल झालेत? पोलिसांनी कोणाला अटक केली? हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज आणि ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांवर गृह मंत्रालयानं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स पोस्टाद्वारे केली आहे.
Badlapur Crime : अटक झाली हल्ल्याच्या गुन्ह्यात, कबुली दिली 3 वर्षापूर्वी केलेल्या कांडाची; नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक वास्तव कसं समोर आलं?
अंबादास दानवे काय म्हणाले?
साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये. साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का? एक विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होते का? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात. सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती? याची उत्तरे फडणवीस यांनी जनतेला द्यावीत, अशी मागणी दानवेंनी केली आहे.
