• Fri. Mar 6th, 2026
    Nashik Crime: कर्जमंजुरीच्या नावाखाली बंटी-बबलीने फसवलं; 5000 नाशिककरांना फेक कॉल्स, असा घालायचे गंडा

    Nashik Crime: नाशकात बंटी बबलीच्या जोडीने चांगलाचा धुमाकूळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकांना फेक कॉल करुन त्यांची फसवणूक केली जात होती.

    fake call center AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, शहरातील अंबड, खुटवडनगरपाठोपाठ आता नाशिकरोड परिसरातील शिखरेवाडीतही बनावट कॉल सेंटर असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

    या बनावट कॉल सेंटरमधून तब्बल पाच हजार नागरिकांना फेक कॉल करण्यात आले असून, कर्जमंजुरीच्या नावे लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, संशयितांमध्ये महिलेचाही समावेश आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Cold Wave: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी! निफाडचा पारा सर्वांत नीचांकी; 5.7 अंशांची नोंद, इतर भागांत काय स्थिती?
    सायबर पोलिसांनी हे बनावट कॉल सेंटर ‘सील’ केले आहे. तेथून संशयित पवन महादू निकम (रा. जेलरोड) याला अटक केली असून, नाशिक न्यायालयाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची मैत्रीण प्रीती उर्फ मयुरी अरुण चौरासिया पसार झाली आहे. दोघांनी दीड वर्षापूर्वी रजनी पार्क अपार्टमेंटमध्ये हे कॉल सेंटर सुरू केले. ‘टेलिकॉलिंग’च्या नावे पाच तरुणींना कामावर ठेवले. या तरुणी गरजवंतांना नियमित फोन करून कर्जमंजुरीचे आमिष दाखवायच्या. कर्जमंजुरीसाठी ‘प्रोसेसिंग शुल्क’ आकारण्यात यायचे.

    Maharashtra TimesNashik Bribe Case: मोठी कारवाई! लाच घेताना सिन्नरचा नायब तहसीलदार ACBच्या ताब्यात, आकडा ऐकून महसूल विभागही हादरलं
    ..असा होता फंडा
    संशयित निकमकडे नाशिकच्या शेकडो नागरिकांची नावे, पत्ते, मोबाइल क्रमांकांची यादी होती. कमी व्याजासह अल्प कागदपत्रांच्या आधारे कर्ज देण्याचे आमिष ते दाखवयाचे. ग्राहक तयार झाल्यावर त्याला शिखरेवाडीतील कार्यालयात बोलावून घ्यायचे. कर्जमंजुरीसाठी पन्नास हजार ते एक लाख रुपये ‘प्रोसेसिंग शुल्क’ आकारण्यात यायचे. मात्र, त्यानंतर कोणतेही कर्ज मंजूर होत नव्हते. एखाद्या ग्राहकाने फारच वाद घातल्यास त्याला ‘प्रोसेसिंग शुल्का’तील जेमतेम रक्कम देत गप्प करण्याचा प्रयत्न व्हायचा, असा त्याचा फसवणुकीचा फंडा होता.

    संशयितांनी १३ तक्रारदारांना सात लाख ७२ हजारांना फसविले आहे. तक्रारदारांची संख्या वाढत असून, ५० नागरिकांपर्यंत पथक पोहोचले आहे. फसवणूक झालेल्यांनी सायबर पोलिसांत अर्ज करावा. – संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा