• Sun. Mar 8th, 2026
    Maharashtra Politics: महायुतीचं अखेर ठरलं! सर्व महापालिका निवडणुका एकत्रच लढणार, रवींद्र चव्हाणांची घोषणा

    Maharashtra Politics: हिवाळी अधिवेशनादरम्यान फडणवीस, शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चव्हाण यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

    ravindra chavan(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    संजय व्हनमाने, नागपूर : स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड, पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि संघटनात्मक स्पर्धा यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या तणाव निवळताना दिसत आहे. विरोधकांना संधी न देता महापालिकांवर पकड मजबूत करण्यासाठी या दोन्ही पक्षांचे मनोमीलन झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच शुक्रवारी स्पष्ट केले.

    ‘सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या स्थापन करून महायुतीचे सूत्र ठरविण्यात येईल. मात्र त्याचवेळी महानगरपालिका निवडणुकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि अन्य घटक पक्षांचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांदरम्यान झालेले मतभेद आणि मनभेद दूर सारण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे.
    Maharashtra Timesविधानसभेत IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी, मंत्री Uday Samant म्हणाले, ’20 दिवसांत…’
    महायुतीमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून संघर्ष संपुष्टात आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

    नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी याबाबतचे संकेत दिले. ‘आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात कसे पुढे जायचे, याबाबत फडणवीस, शिंदे, बावनकुळे व मी अशी संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक झाली. महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु, जिल्हा परिषद निवडणुकांतील आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका कदाचित लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    Maharashtra Times‘त्या’ मंत्र्यांवर बिबट्या सोडा, सुधीर मुनगंटीवार सभागृहात प्रचंड आक्रमक, नेमकं काय घडलं?
    चर्चेच्या फेऱ्या
    हिवाळी अधिवेशनादरम्यान फडणवीस, शिंदे, बावनकुळे आणि चव्हाण यांची बैठक झाली. यानंतर चव्हाण यांनी लागलीच दिल्ली गाठत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे हे दोन्ही पक्ष जवळपास सर्व महापालिका एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
    Maharashtra TimesNagpur Urvashi Bar Video : बिलाची मागणी करताच राग, मध्यरात्री ‘उर्वशी’ बारमध्ये गुंडांची तोडफोड, नागपुरात सिनेस्टाइल राडा; VIDEO
    ‘मुंबईत महायुतीचाच महापौर’
    नागपूर : ‘
    महायुती म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा चांगला परिणाम निवडणुकीत दिसून येईल. मुंबईत आम्ही अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत. मुंबईकर सूज्ञ आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने ते टीका करत आहेत. मुंबईत महापौर हा महायुतीचा असेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये येत्या महापालिकेच्या निवडणुका महायुती करून लढण्याचा निर्णय झाला. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या समित्या एकमेकांशी चर्चा करतील. अडचणी असल्यास वरिष्ठ नेते दूर करतील. कुठल्याही जागेवर राष्ट्रवादी किंवा कुणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर आम्ही लढणार आहोत. अद्याप कुठल्याही जागेबाबत निर्णय झालेला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा