• Fri. Mar 6th, 2026
    Raigad Crime: संपर्क ठेवला तर 5,000 दंड! अंत्यविधीलाही मनाई; गावकमिटीकडून कुटुंबाचा छळ, बहिष्काराने महाराष्ट्र हादरला

    Raigad Social Boycott Case: वळके गावात मधुकर भगत कुटुंबावर गावकीतून बहिष्कार टाकण्यात आला. दंड वसुली आणि अन्यायाला विरोध केल्याने ही कारवाई झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील साळाव मरुड मरहामार्गावरील वळके गावात मधुकर नारायण भगत आणि त्यांच्या कुटुंबाला गेल्या दहा वर्षांपासून गावकीतून बेकायदेशीरपणे वाळीत टाकण्यात आले आहे. दंड वसुली आणि महिलांवरील अन्यायाला विरोध केल्यामुळे गाव कमिटीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करत आहेत.

    वळके गावातील मधुकर नारायण भगत (वय ६६) यांनी गावकीतील दंड वसुली आणि महिलांवरील अन्यायाला विरोध केला होता. या कारणास्तव, गाव कमिटीने त्यांच्या कुटुंबावर बेकायदेशीर बहिष्कार टाकला. सन २०१६ पासून गावकीत पैसे भरले नसल्याने गाव कमिटीने ही तीव्र कारवाई केली.

    फिर्यादी मधुकर नारायण भगत यांच्या तक्रारीनुसार, गाव कमिटीचे अध्यक्ष शंकर कमळया सावंत, खजिनदार गोपीनाथ सहदेव म्हात्रे, सचिव सुधाकर धनंजय भगत आणि सदस्य राजेंद्र गणपत भगत यांच्यासह एकूण ३० जणांनी मिळून मधुकर भगत कुटुंबाला वाळीत टाकले. या आरोपींनी दंडाच्या रकमेची मागणी करत, मागील दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी ५००० रुपये फंड आणि १००० रुपये व्याजासह एकूण ६०,००० रुपये वसूल करण्यासाठी मधुकर नारायण भगत यांच्यावर मानसिक दबाव आणला.

    Maharashtra TimesDhirendra shastri: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री भुतांवर PHd करणार, विद्यापीठाचं नावंही सांगितलं

    या बहिष्काराचा फटका मधुकर नारायण भगत यांच्या वडिलांच्या अंत्यविधीलाही बसला. अंत्यविधीत सहभागी होण्यास गावकऱ्यांना मनाई करण्यात आली होती. जे गावकरी सहभागी झाले होते, जसे की चंद्रकांत श्रीराम भगत, राहुल यशवंत काटकर, पदीबाई महादेव काटकर, धजंजय धनावडे, त्यांनाही प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला. यापैकी चंद्रकांत भगत आणि राहुल काटकर यांच्याकडून १०,००० रुपये वसूल करण्यात आले.

    धजंजय धनावडे यांनी दंड भरला नाही म्हणून त्यांनाही बहिष्कृत करण्यात आले. मधुकर भगत कुटुंबाला मानसिक त्रास देण्यासाठी आणि त्यांना वेठीस धरण्यासाठी ही वाळीत टाकण्याची कारवाई करण्यात आली.

    या गंभीर घटनेनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१६ च्या कलम ३, ३(२)(३)(४)(८)(१०)(१२)(१५)(१६), ५, ६, ७ नुसार तपास सुरू आहे. पोलीस तपास प्रभारी श्रीकांत किरविले यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालला असून, आरोपींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा