• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur News: कामठी नगर परिषद: मतदानानंतर वाद उफाळला, बीआरईएम नेत्या सुलेखा कुंभारेंचे मंत्री बावनकुळेंवर गंभीर आरोप

    जितेंद्र खापरे, नागपूर: कामठी नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान, मतदारांवर दबाव, पैशांचे वाटप आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी मंत्री तथा बहुजन रिपब्लिकन एकता मंच (बीआरईएम) च्या नेत्या ऍड. सुलेखा कुंभारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत “लोकशाहीची हत्या चालू आहे,” अशी तीव्र टीका केली.

    सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, संपूर्ण राज्यात नगरपरिषद निवडणुका झाल्या असल्या तरी कामठी हे केंद्रबिंदू ठरले आहे. कारण या मतदारसंघाचे नेतृत्व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मित्रपक्ष म्हणून भाजपसोबत आम्ही काम करत होतो. मात्र यावेळी भाजपने कोणतीही सन्मानपूर्वक भूमिका न घेता कामठी नगरपरिषदेत सर्व ३४ जागांवर एकतर्फी उमेदवार उभे केले. आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्यामुळे नाराजी निर्माण झाली आणि आम्हाला १५ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करावे लागले, असे त्यांनी सांगितले.

    Thane News: हत्यारं दाखवून सामान्यांना धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांचा पहाटेच ‘शॉक’, दोघांच्या मुसक्या आवळल्या, तलवारी–कोयते जप्त

    कुंभारे यांनी आरोप केला की, निवडणुकीत एकीकडे करोडपती उमेदवार उभे होते, तर आमचे उमेदवार साध्या परिस्थितीतील होते. भाजपकडून अजय अग्रवाल या व्यावसायिकाला उमेदवारी देण्यात आली. आमच्याकडे निवडणूक चिन्ह नोंदणीस उशीर झाल्यामुळे केवळ चार दिवस प्रचारासाठी मिळाले. त्यामुळे प्रचारात असमतोल निर्माण झाला.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीच्या काळात रात्री दहा वाजल्यानंतर तीन दिवस सातत्याने कामठी शहरात फिरून दुकानदार, संस्था चालक व सामान्य मतदारांना धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या उमेदवाराला मतदान केले नाही तर दुकाने बंद केली जातील, संस्थांवर कारवाई होईल,अशा धमक्या देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मंत्रीपदावर असलेला व्यक्ती अत्यंत जबाबदार असतो, पण बावनकुळे यांनी आपली जबाबदारी विसरली, असेही त्या म्हणाल्या.

    राहुल गांधी यांनी दिल्लीवरून मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. तो मुद्दा कामठीत सिद्ध झाल्याचा दावा करत कुंभारे म्हणाल्या की, मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आणि पैशांचे वाटप झाले. आधार कार्ड पाहून पाच हजार रुपये देत मतदान घडवून आणले गेले, अशीही त्यांनी गंभीर तक्रार मांडली. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर अर्धा ते पाऊण तास ईव्हीएम मशीन बंद पडत होत्या. मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याच्या तसेच काही वृद्ध महिलांचे मतदान आधीच कुणीतरी टाकल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

    तीन प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्याबाबत भाजपने पिटीशन दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने आंशिक निवडणुका स्थगित केल्या. मात्र जर निवडणुका पुढे ढकलायच्याच होत्या, तर सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी निकाल ३ तारखेऐवजी २१ तारखेला जाहीर करण्याच्या निर्णयालाही विरोध दर्शविला. “निवडणूक आयोगाला हाताशी धरून मनमानी सुरू आहे. ही लोकशाहीची हत्या आहे,” असे म्हणत सुलेखा कुंभारे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed