• Sat. Mar 7th, 2026

    स्वत: बद्दल व्हॉट्सॲप स्टेटस लावलं, शायरीतून भावना व्यक्त केल्या अन् नंतर… पंचगंगेत उडी, लग्न ठरत नसल्यानं सुमितनं जीवन संपवलं

    स्वत: बद्दल व्हॉट्सॲप स्टेटस लावलं, शायरीतून भावना व्यक्त केल्या अन् नंतर… पंचगंगेत उडी, लग्न ठरत नसल्यानं सुमितनं जीवन संपवलं

    Kolhapur News: कोल्हापूरमध्ये एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. यामागचं कारण त्याचं लग्न जुळत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: “मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया” असं भावनिक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेत या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठे परिसरात राहणाऱ्या सुमित विक्रांत तेली (वय 30) याने बुधवारी रात्री स्टेटस निराशा जनक स्टेटस ठेवल्यानंतर काही तासांतच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने मित्रपरिवारात आणि सोशल मीडियावर या स्टेटसची जोरदार चर्चा सुरू आहे.

    घटनेचा कालक्रम आणि शोधमोहीम

    बुधवारी रात्री सुमित घराबाहेर पडल्यावर रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून नदीत उडी घेतल्याचे काही ओळखीच्या व्यक्तींनी पाहिले आणि तत्काळ याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. तर लगेचच स्थानिकांनी मदतीचे प्रयत्न केले; मात्र अंधार आणि पाण्याला जास्त प्रवाह असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चाललेला शोध निष्फळ ठरला. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. गुरुवारी सकाळी अग्निशमन दल, करवीर पोलिस आणि स्थानिक स्वयंसेवकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजी पुलापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा आणि उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून करवीर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    कुटुंब, व्यवसाय आणि विवाहाची पार्श्वभूमी

    सुमित आई–वडील आणि लहान भावासह शुक्रवार पेठेत राहत होता. शहरातील शाहूपुरी भागात रेडियम आर्ट, ट्रॉफी आणि इतर सन्मानचिन्हांची निर्मिती करणारे दुकान तो चालवत होता. त्याचा व्यवसाय व्यवस्थित सुरू असल्याची माहिती मित्रांनी दिली आहे. मात्र अचानकपणे अशी ही घटना घडल्याने मित्रांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

    Maharashtra TimesWhite House Shooting: व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, दोन गंभीर जखमी गार्ड्सपैकी एकाचा मृत्यू; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काढला थेट आदेश, म्हणाले….

    नैराश्यातून उचलले पाऊल

    गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या विवाहासंदर्भातील चर्चा नातेवाइकांत सुरू होत्या, तुलसी विवाहानंतर घरच्या मंडळींनीही याबाबत हालचाली वाढवल्या; मात्र योग्य जुळणी न झाल्याने तो नैराश्यात गेल्याची प्राथमिक आहे. बुधवारी रात्री कुटुंबीयांशी काही काळ झालेल्या बोलण्यानंतर तो अचानक घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ धावत गेलेल्या भावासमोरच त्याने पुलावरून थेट नदीत उडी मारल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

    पोलिसांचा तपास आणि मानसिक आरोग्याचा मुद्दा

    घटनेनंतर करवीर पोलिसांनी सुमितचा मोबाईल जप्त करून त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस, चॅट आणि कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली. आत्महत्येच्या निर्णयामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विवाह न जमणे, नैराश्य यासोबतच वैयक्तिक नातेसंबंध, सामाजिक दबाव किंवा इतर काही कारणे होती का, याबाबत कुटुंबीय आणि मित्रांचीही सविस्तर चौकशी केली जात आहे, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.

    दरम्यान, तिशी ओलांडूनही विवाह न होणे, समाजातील बोलबाला आणि आत्मसन्मान यामुळे तरुणांना मानसिक ताण येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांकडून अधोरेखित केले जात असून अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन आणि कुटुंबीयांचे भावनिक पाठबळ किती महत्त्वाचे आहे, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा