• Sun. Mar 8th, 2026
    भास्कर राव, आपला उमेदवार असताना कुणाला पाठिंबा देताय? थेट ‘मातोश्री’वरुन समज, कोकणात धूमशान

    Bhaskar Jadhav : रमेश कदम यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे थेट मातोश्रीवरुन भास्कर जाधव यांना समज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

    भास्कर जाधव-उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच दोन गट पडल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी चिपळूण येथील राजू देवळेकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले आहे. याच वेळी महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी आमदार रमेश कदम यांना ठाकरेंचे शिलेदार भास्कर जाधव यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवरुन भास्कर जाधव यांना समज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

    नेमकं काय घडलं?

    विनायक राऊत यांनी ठाकरे गटाचे नगरसेवक राजू देवळीकर यांच्यासह 24 उमेदवार चिपळूण नगरपरिषदेत उभे केले आहेत. मात्र विनायक राऊत व भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांमधील वाद ऐन निवडणुकीतच चव्हाट्यावर आले आहेत. भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला असतानाच विनायक राऊत यांनी मात्र चिपळूण येथे येऊन आमची महाविकास आघाडी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर भास्कर जाधव यांची नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीजवळ बोलताना मला एका निर्णयापर्यंत यावं लागेल असे बेधडक विधान केलं होतं.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : ठाकरेसेनेच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    ‘मातोश्री’वरुन भास्कर जाधव यांना समज

    यानंतर भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांचा जाहीरपणे सभा घेत प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवरून भास्कर जाधव यांना संपर्क साधण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. पक्षाला नुकसान होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका, असा सल्ला भास्कर जाधव यांना देण्यात आला आहे.
    Maharashtra TimesNashik News : सुपारीसोबतच प्रचाराचा नारळही फुटला! महायुतीकडून तिकीट, मतदानाच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त, नवरदेव ‘उमेदवार’ म्हणतो…
    मात्र आता या आदेशानंतर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कोणता निर्णय घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीतच जिल्ह्यात ठाकरे गटात या दोन मोठ्या नेत्यांमधील वाद समोर आले आहेत

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा