• Sun. Mar 8th, 2026
    …अन्यथा निवडणुका रद्द करा; ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, मागितला 21 दिवसांचा वेळ, पत्रात काय?

    Thackeray Brothers: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

    raj uddhav thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकप्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राज- उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्राद्वारे केली आहे. तसेच हरकती, सूचनांसाठी निवडणूक आयोगाने २१ दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करून सर्व याद्या सुरळीत कराव्यात’, अशी मागणीही त्यांनी केली.

    आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी ही दोन पत्रे दिली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून येत्या २ डिसेंबरला नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर, जानेवारी महिन्यात राज्यातील मुंबईसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांतील घोळ आणि त्रुटी दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे.
    Maharashtra TimesMumbai Fire: घाटकोपरमध्ये गॅस गळतीची भीषण दुर्घटना; घरगुती सिलिंडर रेग्युलेटर हाताळताना आग, सहा जण होरपळले
    निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी ही ३० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशित झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असे काही झालेच नाही. का? हे हेतुपुरस्सर होते असे म्हटले तर निवडणूक आयोगाला लगेच राग येतो. पण जर ते हेतुपुरस्सर नसेल तर मग कारण काय’, असा प्रश्न या पत्रात करण्यात आला आहे. ‘तुमच्या संकेतस्थळावर नवीन मतदारनोंदणी, वगळलेली नावे आणि बदल यासह जे प्रसिद्ध केले आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केले आहेत, असे म्हणायला पूर्ण वाव आहे. नवीन सुधारित यादीत स्त्री, पुरुष, त्यांचा पत्ता याचा कोणताही तपशील नाही. जेव्हा सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ चोकलिंगम यांना भेटले होते, तेव्हात्रुटींशिवाय आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि सूचनांचे पालन करू असे सांगितले होते. त्याचे काय झाले’, असाही प्रश्न करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesLadki Bahin Yojna: मोठी अपडेट! eKYC ठरली गेमचेंजर, ‘या’ लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांना लागला कायमचा ब्रेक…
    हा देशद्रोहाचा गुन्हा
    आम्ही राज्य निवडणूक आयोगाला भेटून आलो. त्यांना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे पत्रही दिले आहे. निवडणुका आज होतील, उद्या होतील, अजूनही काहीही नाही. हे सरकार मते चोरून सर्व करत आहे’, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मुंबई महापालिकेसाठी प्रभाग सीमा जाहीर झाली. प्रारूप मतदारयादी ७ नोव्हेंबरला तारखेला येणार होती, नंतर ती १४ नोव्हेंबरला येणार असल्याचे सांगितले, मग प्रत्यक्षात ती २० नोव्हेंबरला आली. भाजप सोडून सर्व विरोधी पक्षांनी यादी वाचन सुरू केले आहे. जात-धर्म पाहून याद्या बदलून आल्या आहेत. सगळ्या वार्डात हे केलेले नाही तर फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डांत, यादीत हे केले आहे. हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. पारदर्शक निवडणुका म्हणता, मग हे का झाले, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.

    तुमची स्वायत्तता दाखवाच

    ‘तुम्ही ५ डिसेंबर २०२५ ला एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केले असं सांगून स्वतःच समाधान कराल. पण महाराष्ट्रातील जनतेला हे माहित आहे की तुमच्या कामाप्रती प्रामाणिकता नाही. तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच’, असेही या पत्रात म्हटले आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा