• Mon. Aug 3rd, 2026

    राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2026
    राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    • शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश

    मुंबई, दिनांक ३ : शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पीजीआय 2.0 मध्ये देशात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. राज्यात पीएम श्री शाळांसह सर्व शाळांमधून चांगले शिक्षण दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय आधार प्रमाणीकरण, आरटीइद्वारे 35 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ, पवित्र पोर्टल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, यासह विविध शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी  यावेळी माहिती घेतली.

    राज्य शासनाने शाळांमध्ये नशाविरोधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा आणि ‘ड्रग-फ्री स्कूल’ अभियान राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमधील सुरक्षा, सायबर फसवणूक आणि अमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी व कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

    राज्यातील विद्यार्थी-शिक्षक प्रमाण – २८ : १

    देशातील एकूण शाळांपैकी ९.३४ टक्के, शिक्षकांपैकी ८.८४ टक्के आणि विद्यार्थ्यांपैकी ७.६९ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यातील १,०८,०६५ एकूण शाळा मध्ये २,२०,४८,४४३ विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २८ : १ आहे. राज्यातील शाळांमध्ये ६४,३४१ शासकीय, २९,४८६ खासगी अनुदानित आणि उर्वरित स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्रीय शाळा आहेत. शालेय शिक्षण व्यवस्थेचा विस्तार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य शासन विविध स्तरांवर सुधारणा राबवत आहे. निपुण महाराष्ट्र अभियान, राष्ट्र प्रथम अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव सारखे कार्यक्रम याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.

    यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी शाळांमध्ये नशामुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे सांगितले.

    शिक्षकांसाठी एआयसाथीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण देखील राबविण्यात आले आहे. शिक्षकांचे अभ्यास दौरे, चांगले काम करणाऱ्या शिक्षण समित्या व शिक्षकांच्या सहभागाने उपक्रमांना चालना, दत्तक शाळा, सीएसआर-सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवीन विचार देखील सुरू झाला आहे. यातूनच शासकीय शाळांमध्ये सुपर 100 योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवान शंभर विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षांचे स्पर्धात्मक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी निवड केली जाईल.

    राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला केंद्र सरकारच्या वतीने एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात  विस्तृत स्थान देण्यात आले आहे. अभ्यासक्रमात याचा अधिक व्यापक समावेश करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यासोबतच राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या (एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी) शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे व मराठी विषयाची परीक्षा घेणे सक्तीचे केले आहे, याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

    0000

    किरण वाघ/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed