Dharashiv News: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी यावेळी गंभीर आरोप केला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत घेण्यासाठी तीन वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. अध्यक्षपदाची जागा, उपाध्यक्ष पद आणि तीन नगरसेवकांचा पाठिंबा देण्याची तयारी दर्शवूनही, रात्रीत काहीतरी घडले आणि त्यांनी आघाडी तोडली. हे सर्व ‘जुन्या मालकाच्या सांगण्यावरूनच’ झाले असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या आरोपांमधून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिवमधील प्रमुख नेते होते. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडी तोडण्यामागे त्यांचा हात असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने परवीन खलील कुरेशी यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःचे उमेदवार उभे केल्यामुळेच या आघाडीत फूट पडली आहे. या घडामोडींमुळे धाराशिव नगरपरिषदेच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
पैसे वाटपाचा प्रकार जुनाच आहे – ओम राजेनिंबाळकर
कळंब येथे काल रात्री भाजपाच्या उमेदवार पतीने प्रभाग क्रमांक सहा मध्ये पैसे वाटत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं होतं, यादरम्यान, दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून एकमेकाविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, यावर उभाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार नवीन नसून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा घडलेला आहे. पैसे वाटपाचा प्रकार हा नवीन नसून जुनाच आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रावेगाव येथे रात्री बारा वाजल्यापासून हा प्रकार सुरू होता, आम्ही शोध घेतला असून वाघ नावाच्या गृहस्थाने पैसे वाटल्यास समजलं आहे, असं ओम राजे निंबाळकरव म्हणाले आहेत.
