Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महायुतीमध्ये अभूतपूर्व नाराजीनाट्य सुरु आहे. आज मंगळवारचा दिवस असल्याने राज्यभरातील जवळपास सर्वच मंत्री महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असतात. कारण मंगळवारच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असते. राज्यभरातील जनतेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय मोलाचे आणि मोठे निर्णय घेतले जातात. पण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या इतर मंत्र्यांना बहिष्कार टाकला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील फडामोडीच्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी फोडणार नाही, असा निर्णय या बैठकीत झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही तर ऑफ द रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी थोडक्यात पण स्पष्ट भूमिका मांडली आहे. “महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. खाली काही असले तर सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे. आरोप-प्रत्यारोप बाजूला सारून एकत्र राहावे. युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. भाजपच्या नेत्यांना तशी बाब सांगायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. शिवसेनेच्या नेत्यांना तशी बाब सांगायची जबाबदारी माझी”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.”आमचे एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत. डबल इंजिन सरकार मी सातत्याने बोलतो. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. गोरगरिबांच्या चांगल्या दिवसाचा आहे. आमचा अजेंडा स्वच्छ आहे. आम्ही विचारधारा घेऊन जातो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यानी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
दरम्यान, शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या घडामोडींवरुन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवर टीका केली आहे. “असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर! पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
“मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा