• Fri. Mar 13th, 2026
    Maharashtra Politics: मित्रपक्षच आमनेसामने; बहुसंख्य नगर परिषदांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी वाट

    Maharashtra Politics: उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी हे चित्र दिसले. २१ नोव्हेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुती आणि आघाडीमध्ये समेट घडते की, वेगळी वाट कायम राहते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

    flags(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेत विरल्या असून प्रत्यक्षात महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. नगर परिषद निवडणुकांसाठी ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत भाजप आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

    बदलापूरमध्ये शिवसेना स्वतंत्र लढत असून भाजप आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये युती आहे. येथे महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहेत. पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असून महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी (शप), जनता दल, मनसे एकत्र लढत आहेत. जव्हार नगर परिषदेत भाजप वेगळा लढत असला, तरी येथे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांची युती झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) एकत्र आहेत. डहाणूमध्ये भाजपविरोधात शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शप) हे तीन पक्ष एकत्र येऊन महाआघाडी झाली आहे. येथे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) आणि माकप हे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
    Maharashtra TimesLadki Bahin Yojana : वडील किंवा पतीचं निधन, अथवा घटस्फोटीत महिलांनी E-KYC कशी करावी? सरकारकडून महत्त्वाची सूचना
    रायगडमध्ये सरमिसळ
    अलिबाग येथे महायुतीत भाजप, शिवसेना एकत्र असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीतील शेकाप आणि काँग्रेस एकत्र लढत असून शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) स्वतंत्र लढत आहेत. पेणमध्ये भाजप, राष्ट्रवादी यांची युती झाली आहे. शिवसेना (शिंदे) वेगळी लढत आहे. येथे पेण विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी हे स्वतंत्र पॅनल असणार आहेत. मुरुड जंजिरामध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती असून शेकाप, काँग्रेस यांची आघाडी आहे. शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उबाठा) हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत. महाडमध्ये भाजप, राष्ट्रवादी एकत्र असून शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) आघाडीमध्ये आहेत. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी-भाजप यांची युती आहे. तर रोह्यात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याविरुद्ध इतर पक्ष एकत्र लढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती असून त्याविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. तर काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांची महायुती झाली असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने येथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपसाठी सहा जागा देण्यात आल्या आहेत. चिपळूण नगरपरिषदेत शिवसेना, भाजप युती असून राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. खेड, राजापूरमध्येही महायुती एकत्र लढणार आहे.

    Maharashtra Times‘चार महिने पुतळ्याचं अनावरण होतं नाही हा महाराजांचा अपमान आहे’, अमित ठाकरेंचं नेरुळ प्रकरणावर स्पष्टीकरण
    अंबरनाथमध्ये उबाठा-मनसे एकत्र
    अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसे एकत्र लढणार आहेत. येथे मनसेच्या १४ उमेदवारांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माध्यमातून अर्ज भरल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहेत. काँग्रेसने मात्र वेगळी वाट धरली आहे.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे समीकरण
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण या तिन्ही नगर परिषदांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला. या पक्षाचे उमेदवार हे शिवसेना (उबाठा) पक्षाशी संबंधित असल्याने नवे समीकरण पाहायला मिळत आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा