Amit thackeray: नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिने झाकून ठेवल्याबद्दल अमित ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी स्वतः पुतळ्याचे अनावरण केले.
“मला कार्यकर्त्यांनी कळवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं असं झालं आहे. त्यानंतर आधी आमची चर्चा झाली की आपण 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊयात. त्यावेळी मी म्हणालो की, मीच उद्घाटन केलं तर काय होईल, मला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की केस दाखल होईल. महाराजांसाठी केस दाखल होत असेल तर होऊदे. चार दिवसांची वाट कशाला बघायची. महाराजांना घाण कपड्यात गुंडाळून ठेवलं आहे तर त्याला आजच काढून टाकुयात”, असा खुलासा नेरुळमधील पुतळा उद्घाटन प्रकरणावर आज अमित ठाकरेंनी केला आहे, ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी पुतळ्याचं उद्घाटन करताना आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचंही यावेळी अभिनंदन केलं आहे. त्याचवेळी महाराजांसाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला याचा मला आनंद आहे खूप बरं वाटलं असंही अमित म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री, पंतप्रधान येतात जातात. सगळी उद्घाटन करतात. यांना महाराजांसाठी वेळ मिळत नाही, असं समजायचं का? तुमच्या नेत्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही महाराजांना गुंडाळून ठेवणार का?, चार महिने पुतळ्याचं अनावरण होतं नाही हा महाराजांचा अपमान आहे, महानगरपालिकेने जबाबदारी घेऊन पुतळ्याचं अनावरण करणं गरजेचं होतं. मी माझ्य भाग्य समजतो की माझ्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंबद्दल म्हणाले…
आदित्य ठाकरेंनी या प्रकरणाला पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे. त्यावरही अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आदित्यजीनी ट्वीट केलं आहे. ते मी वाचलं आहे. महाराजांसाठी प्रत्येक मराठी माणूस पेटून उठतो. त्यामुळे आदित्यनी केलेल्या कौतुकासाठी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांना आता मी भेटणार आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

