इंदापुरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. इंदापूरमधील घडामोडी सध्या राजकीय राजकारणात चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.
प्रदीप गारटकर यांच्या बंडापेक्षा इंदापूर तालुक्याचा 1995 पासूनचा इतिहास जरा लक्षात घेऊ. इंदापुरात 1995 मध्ये तत्कालीन काँग्रेस पक्ष सोडून हर्षवर्धन पाटील या युवकाने इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून पहिले बंड केले. हे बंड यशस्वी झाले! विद्यमान आमदार गणपतराव पाटील आणि इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांना हरवून हर्षवर्धन पाटील हे माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या पाठिंब्याने इंदापूरचे आमदार झाले. फक्त आमदारच नाही तर युती सरकारमध्ये मंत्री देखील झाले आणि त्यानंतर 15 वर्ष हा विकास आघाडीचा प्रयोग सुरू राहिला.
अर्थात या काळात हर्षवर्धन पाटील मंत्री असले तरी इंदापूरचे राजकारण मात्र शहा कुटुंबाभोवती फिरत राहिलं. इंदापूर शहरावर शहा कुटुंबाचा प्रभाव आहे. वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने प्रभावित असलेले हे कुटुंब इंदापूरच्या सर्व प्रभागात आपली नाळ टिकवून आहे. मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांच्याशी शिक्षण संस्थेच्या वादावरून शहा आणि पाटील यांच्यात बिनसले आणि शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली. तेव्हापासून दत्तात्रय भरणे हे शहा कुटुंबावर राजकीय प्रभावाकरिता गळ टाकून होते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी शहा यांची चर्चा झाली आणि शहा यांच्यासह त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास तयार झाले. अर्थातच त्यातील पहिली अट होती ती नगराध्यक्ष पदाची! आणि इथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मिठाचा खडा पडला.
इंदापुरात तसेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे तेवढे साख्य नव्हतेच. त्यातच गारटकर यांचा पिंड पूर्वीचा पतीत पावन संघटनेचा म्हणजेच भाजपच्या हिंदुत्वाचा. मध्यंतरीच्या वीस वर्षात भाजप पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसवरील प्रेम असे समजून गारटकर या पक्षात रमले. मात्र अंतर्गत धुसफूस सुरूच होती. जेव्हा भरत शहा पक्षात येण्यास तयार झाले आणि त्याच वेळी आपल्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा समजून गारटकर यांनी त्यांच्या प्रवेशाला हरकत घेतली.
‘काही लोक गणतीतच धरत नाहीत’; गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत
गारटकरांचा मूळ स्वभाव आणि पिंड आक्रमक आहे. मधल्या काळात तो स्वभाव मवाळ झाला असला तरी इंदापूर शहराचं राजकारण हे आपल्या भोवतीच फिरलं पाहिजे हा गारठकरांचा मनोदय. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची बैठक झाली. मात्र दत्तात्रय भरणे भरत शहा यांना पक्षात घेण्यास उत्सुक होते आणि त्यांनी तसा हट्ट धरला. हा हट्ट कायम दिसताच गारटकर यांनी बंड केले आणि याच दरम्यान त्यांनी देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्याशी सल्लामसलतीला सुरुवात केली. आणि लागलीच या तिघांच्या नव्या विकासाकडे जन्म घेतला. आता इंदापुरात काय होणार येणारा काळ ठरवेल? मात्र या निमित्ताने इंदापूर पुन्हा एकदा नवीन विकास आघाडीचा प्रयोग जन्म घेतोय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

