• Sun. Jun 7th, 2026
    सू करायला थांब, मग मी येतो आणि… विवाहिता मिस्त्रीच्या नादाला लागली, नवऱ्याला जंगलात नेलं अन्… महाराष्ट्रातील घटना

    Wife Murders Husband : ४२ वर्षीय प्रमोद बकाराम भलावी यांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा पोलिसांनी काही तासांत लावला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमरावती : अमरावती येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तरुणाची पत्नी वर्षभरापूर्वी घराची डागडुजी करण्यासाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात पडली. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने प्रियकरासोबत मिळून कट रचला होता. भररस्त्यात पतीचा खून काढण्याचा प्लॅन आखला होता. अखेर पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर अशा दोघांनाही या प्रकरणी अटक केली आहे.

    अमरावतीतील हनुमान गढी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात १२ नोव्हेंबरला रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ४२ वर्षीय प्रमोद बकाराम भलावी यांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला. गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रमोदची पत्नी छाया आणि तिचा ३९ वर्षीय प्रियकर विश्वंभर दिगंबर मांजरे यांना अटक केली.

    मयत प्रमोद भलावी हा चंद्रपूरमध्ये खासगी काम करत होता, तर त्याची पत्नी छाया सात वर्षांपासून माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होती. त्यांना दोन मुलं आहेत. प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी राहत होता. वर्षभरापूर्वी घरातील कामाच्या निमित्ताने भेट झालेल्या मिस्त्री विश्वंभरच्या प्रेमात छाया आकंठ बुडाली. दोघांचे प्रेमसंबंध सुरु झाले. पण काही काळातच त्यात अडथळे येऊ लागले.

    “आपल्या संबंधांची प्रमोदला कुणकुण लागली आहे. तो आणि एक महिला नातेवाईक मला दररोज त्रास देतात. त्यामुळे आता त्याचा काटा काढावाच लागेल” असं छायाने विश्वंभरला सांगितलं.

    लघुशंकेचा बहाणा कर

    विश्वंभरने छायाला सांगितले की, तू पतीला सोबत घेऊन अंजनगाव बारीकडे निघ. मी आधीच जंगल परिसरात जाऊन लपतो. लघुशंकेचा बहाणा करुन थांबा, मग मी मागून त्याच्यावर वार करतो.”

    ठरलेल्या योजनेनुसार १० नोव्हेंबर रोजी रात्री छाया दस्तूरनगर परिसरात थांबली. दोघंही तिथेच एका हॉटेलमध्ये जेवले. त्यानंतर नेरपिंगळाई येथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या सुमारास अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी बाजारातून कोयता विकत घेतला.

    त्यानंतर छायाने पतीला फोन करून बोलावलं. प्रमोद रात्री दहा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने दस्तूरनगरला आला. जंगल परिसरात छायाने सू-सू लागल्याचा बहाणा करुन त्याला दुचाकी थांबवायला सांगितली. दोघंही दुचाकीवरुन खाली उतरताच जंगलात आधीच दडून बसलेल्या विश्वंभरने प्रमोदच्या मानेवर कोयत्याने वार केले.

    नवऱ्याचं सिम तोडून फेकलं

    प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर दोघांनीही त्याचा मृतदेह नाल्याशेजारी नेऊन टाकला. त्याची दुचाकीही तिथेच टाकली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही त्याच्या चेहऱ्यावर दगडाने अनेक वेळा घाव घातले. रात्री १०.५० वाजताच्या सुमारास दोघं अंजनगाव बारीला पोहोचले. छायाने प्रमोदचा मोबाइल स्वतःजवळ ठेवला, तर त्यातील सिम तोडून फेकून दिलं. प्रियकर रात्रभर छायाच्या घरी राहिला. ११ तारखेला ते गावी पोहोचले.

    आरोपी पत्नीनेच पतीच्या मिसिंगची तक्रार नोंदवली होती. मात्र पती नेमका कुणासोबत बाहेर पडला, याबाबत तिने चुकीची माहिती दिली. त्यामुळे तिच्यावरचा संशय बळावला. चौकशीदरम्यान तिच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांनाही अटक केली असून दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा