• Thu. Jun 18th, 2026
    सोशल मीडियावर वाघ, बिबट्यांच्या हल्ल्यांचा एआय VIDEO व्हायरल; व्हिडीओत वाघ सुरक्षारक्षकालाच उचलून…

    Tiger Attack AI Video: ब्रह्मपुरी येथील वाघाच्या हल्ल्याचा ‘एआय’ व्हिडीओमुळे तंत्रज्ञानाचा वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. या बनावट व्हिडीओंमुळे लोकांमध्ये भीती आणि राग वाढून मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची शक्यता आहे.

    म.टा. प्रतिनिधी, चंद्रपूर: ब्रह्मपुरी येथील वाघहल्ल्याच्या ‘एआय’ व्हिडीओमुळे तंत्रज्ञानाचा वन्यजीवांना निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल चर्चेला प्रारंभ झाला आहे. या बनावट व्हिडीओंमुळे लोकांच्या मनात वन्यजीवांविषी भीती आणि त्यातून राग निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे एआय व्हिडीओ तयार केले जात असून त्याचे पडसाद उमटण्यासही सुरुवात झाली आहे.

    वन्यजीवांशी संबंधित बनावट व्हिडीओंचा सोशल मीडियावर सध्या पूर आला आहे. ब्रह्मपुरी येथील विश्रामगृहाच्या सुरक्षारक्षकाला वाघ उचलून नेत असल्याचा व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. ‘एआय’द्वारे तो तयार केला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने याबाबत कायदेशीर कारवाईचाही निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध व्हिडीओ सध्या वारंवार प्रसृत केले जात आहेत. ब्रह्मपुरीच्या व्हिडीओच्या अगदी उलट व्हिडीओदेखील तयार झाला आहे. यामध्ये, वाघ माणसाला परत आणून खुर्चीवर बसवतो आणि पाणीही पाजतो , असे दाखविण्यात आले आहे. अन्य एका व्हिडीओत माणूस वाघाला दारू पाजताना दाखविला आहे. याशिवाय, बिबट किंवा वाघ घरात घुसून माणसांना मारत असल्याचे कित्येक व्हिडीओ आहेत.
    Maharashtra Timesमानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, घटनेनं हळहळ

    या प्रकारच्या बनावट दृश्यांमुळे अफवा पसरण्याची आणि लोकांच्या मनात वन्यजीवांविषयी राग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मानव-वन्यजीवसंघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. चुकीच्या माहितीमुळे वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांनाही धक्का पोहोचेल. अशी भीती वन्यजीवतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

    प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र येण्याची इच्छा, जनता एकत्र येत नाही; रामदास आठवलेंनी अडचण सांगितली

    ‘एआयच्या आधारे बनविलेले व्हिडीओ कसे ओळखावे, हे नागरिकांना समजावून देणे गरजेचे आहे. असे खोटे व्हिडीओ तयार करणे जसे चुकीचे आहे तसेच विचार न करता ते फॉरवर्ड करणेही टाळायला हवे. तंत्रज्ञानामुळे हे नवे प्रश्न निर्माण केले आहे. त्यावर, वनविभागाला उपाययोजना कराव्या लागतील. याशिवाय, असे व्हिडीओ तयार करणाऱ्यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई होणेही गरजेचे आहे. तसे झाल्यास या प्रकारांना आळा घालता येईल’, असे मत वन्यजीवतज्ज्ञ आणि सातपुडा फाउंडेशनचे उपसंचालक मंदार पिंगळे यांनी व्यक्त केले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा