कोथरूडमधील मुलींवरील मारहाण आणि जातीभेदाच्या तक्रारीवरून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून पुण्यात येऊन आश्रय घेतला होता. या महिलेला आधार देणाऱ्या तीन मुलींना मदत करण्याची शिक्षा भोगावी लागली, असे आरोप पीडितांनी केले. त्यांच्या मते, कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान जातीय शिवीगाळ, शाब्दिक अपमान तसेच मारहाणीचा अनुभव सहन करावा लागला.
प्रकरणाचा आवाज वाढताच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर तसेच आमदार रोहित पवार यांनी थेट हस्तक्षेप केला आणि पीडित मुलींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचले.
कोर्टाने नेमके काय निर्देश दिले?
कोर्टाने तात्काळ निर्देश देत कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे, महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप आणि माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
इतकेच नव्हे तर या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे केला जावा, यासाठी संपूर्ण चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे वर्ग करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. आता तपास प्रक्रिया कशी पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bihar Exit Poll: काँग्रेसला केवळ 4 ते 8 जागा, तर NDA थेट 200 पार, POLL DIARY च्या एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
आता हे प्रकरण पोलिसांना भारी पडणार का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. संबंधित प्रकरणाची समाज माध्यमांवर प्रचंड चर्चा झाली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती. अनेकांनी पीडित मुलींच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यामुळे आता या प्रकरणात कोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

