• Fri. Mar 6th, 2026
    Raigad News: कोकणातल्या ‘या’ पाच समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा, विकासासाठी राज्य सरकारने मंजूर केले 20 कोटी

    Kokan beach development: कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट’ दर्जा मिळाला आहे. यामुळे पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे. राज्य सरकारने या किनाऱ्यांवर सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

    रायगड, अमुलकुमार जैन: कोकणातील पाच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘ब्लू फ्लॅग पायलट’ मान मिळाल्यामुळे पर्यटन क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या किनाऱ्यांवर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर जिल्ह्यातील पर्णका या पाच किनाऱ्यांचा समावेश आहे.

    या निधीचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून प्रत्येकी किनाऱ्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये आधीच वितरित केले गेले आहेत. या निधीचा उपयोग समुद्रकिनाऱ्यांवर मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. यात सार्वजनिक शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी, पार्किंग सुविधा, कपडे बदलण्याच्या खोल्या, तात्पुरती दुकाने, कचराकुंडी, जीवरक्षक टॉवर, सौरदिवे, दिशादर्शक मंडळे, पथदिवे, प्रवेश रस्ते, सुरक्षा रक्षक तसेच कचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

    Raigad News: वाशी-पनवेल लोकलमध्ये तरुणांची हुल्लडबाजी; प्रवाशांना नाहक त्रास, स्टेशन येताच टवाळखोरांचं वातावरण टाईट

    डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन संस्थेने या किनाऱ्यांना पायलट प्रोजेक्ट म्हणून ब्लू फ्लॅग मान्यता दिली आहे. या मानकांमध्ये पर्यावरण संवर्धन, पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा आणि साफसफाई यांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाने या कामांसाठी उच्च दर्जा राखण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी वास्तुशास्त्रज्ञ आणि विषयतज्ज्ञांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे, तसेच कामे प्रसिद्ध कंत्राटदारांद्वारे करावीत आणि दर्जा व देखरेख सुनिश्चित करावी, असे स्पष्ट केले गेले आहे.

    या प्रकल्पाचे काम तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन आहे. एकदा प्रारंभ आदेश जारी झाल्यानंतर, काम सुरू झाल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कार्यवाहीत बदल किंवा थांबविणे शक्य नाही. निविदा प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात आली असून कामासाठी प्रारंभ आदेश जारी केले गेले आहेत. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि गुणवत्तेची हमी राहील.

    महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, श्रीवर्धनसह या पाच किनाऱ्यांनी ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळवल्यामुळे पर्यटनास नवसंजीवनी मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटनाबरोबर स्थानिक रोजगारास देखील चालना मिळेल. किनाऱ्यांवर सुरक्षा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या पद्धतींचा समावेश असल्यामुळे स्थानिकांसह देश-विदेशी पर्यटकांना अधिक आकर्षण मिळेल.
    समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणीय नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. यामुळे किनाऱ्यांचे प्रदूषण कमी होईल, समुद्री जीवनाचे संरक्षण होईल आणि पर्यटन टिकाऊ होईल. यासह, पर्यटकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांची हमी मिळणे राज्याच्या पर्यटन धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

    कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांचे संवर्धन आणि पायाभूत सुविधा विकास हे राज्याच्या पर्यटन धोरणात मोलाचे पाऊल ठरले आहे. रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पर्यटन वाढीस चालना मिळेल, पर्यावरण आणि सुरक्षा मानके राखली जातील आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी वाढतील. भविष्यात हे किनारे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed