• Sat. Jun 6th, 2026

    HSRP कडे वाहनधारकांची पाठ, डेडलाईन संपायला उरले फक्त काही दिवस, आता परिवहन विभागाची महत्त्वाची सूचना

    HSRP कडे वाहनधारकांची पाठ, डेडलाईन संपायला उरले फक्त काही दिवस, आता परिवहन विभागाची महत्त्वाची सूचना

    Palghar HRSP Number Plate registration : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत.

    एचएसआरपी नंबरप्लेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, वसई : वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यात २०१९ पूर्वीची चार लाख ७८ हजार ९३१ वाहने असून, ऑक्टोबर अखेरीस त्यापैकी केवळ एक लाख ६४ हजार ५८२ वाहनधारकांनी आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लाऊन घेतलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही तीन लाखांच्या घरात वाहनचालकांनी याकडे पाठ फिरवली असून, पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

    परिवहन विभागाचे आदेश

    उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्या या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. वाहनांचा अपघात झाल्यास वाहन मालकाची सर्व माहिती मिळणे, वाहनांची चोरी आणि गैरवापर टाळणे यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक लाऊन घेण्याचे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहन खरेदी केल्यास वाहन वितरकाकडूनच या नंबर प्लेट उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. राज्यात सर्वप्रथम ३० एप्रिल ही डेडलाइन यासाठी देण्यात आली होती. वाहनधारकांचा प्रतिसाद अपुरा असल्याने त्यानंतर ३० जून, पुढे १५ ऑगस्ट आणि आता ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत वाहनांना ही नंबर प्लेट लाऊन घेण्यासाठी देण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune Metro : क्या बात है! पुण्यात स्वयंचलित मेट्रो धावणार, ‘लोकोपायलट’शिवाय 25 ट्रेन चालवण्याची तयारी
    पालघर जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने आहेत. त्यापैकी मार्च २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी आपल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लाऊन घेतल्या. १९ मे पर्यंत ७० हजार ७८८ वाहनधारकांनीच या नंबर प्लेट लावून घेतल्या.

    ऑनलाइन प्रक्रिया करता येणार

    ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत असल्याने आता केवळ २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यातच अजून ३ लाख १४ हजार ३४९ वाहनधारकांनी आपल्या वाहनासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्व वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्या लावण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले असून यासाठी शहरांमध्ये अधिकृत केंद्र उघडण्यात आलेली आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतः देखील ऑनलाइन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे. तरी शिल्लक २८ दिवसांत तीन लाख वाहनधारकांच्या पाट्यांचा प्रश्न मार्गी लावणे हे आता परिवहन विभागासमोर मोठे आव्हान आहे.
    Maharashtra TimesPuneet Gupta : मी फोनवर 100-500 कोटींच्या डीलवर बोललो अन् ड्रायव्हरने माझ्यासाठी थेट… CEO ना चक्रावणारा अनुभव
    उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी आपल्या वाहनांना वाहनधारकांनी बसवून घ्यावी यासाठी आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली असून वाहनचालकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करून वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
    -अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा