जालना शहरात सध्या गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. रोज या ना त्या घटना घडत आहेत. त्यामुळे जालन्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता समोर आलेली चोरीची घटना ही परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकूर हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह इंदूर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटाच्या कडीकोंडा तोडून त्यात ठेवलेले 15 ग्राम वजनाची गळ्यातील सोन्याची पोत आणि 5 ग्राम वजनाची सोन्याची बदामी अंगठी, 6000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, सोन्याचे सिक्के आणि रोख 27 हजार रुपये असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
ही बाब शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी राजेंद्र ठाकूर यांना केला. त्यांनी फोनवर राजेंद्र यांना घरात झालेल्या चोरीची माहिती दिली. तुमच्या घरात चोरी झाली आहे, असे कळवले. यावेळी त्यांनी तात्काळ जालना शहर गाठले आणि पाहणी केली असता ते चकित झाले. कारण चक्क पोलिसाच्या घरात चोरी झाली. त्यामुळे हा विषय चर्चेला कारण ठरला आहे.
राजेंद्र ठाकूर यांनी वेळ वाया न घालवता अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्री ही घटना सपूर्ण जालना शहराच चर्चेत आहे. आता चक्क पोलिसाच्या घरातच चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल केला जातोय. या निमित्ताने पुन्हा एकदा जालना शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जालना शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, भुरट्या चोरट्यांपासून शहरवासीयांची सुरक्षा करावी, अशी मागणी केली होती. पण आता पोलिसांनाच चॅलेंज करत या भुरट्या चोरट्यांनी चक्क पोलिसाच्या घरात चोरी केली. त्यामुळे पोलीस या चोरट्यांचा शोध घेणार का? असाच प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

