• Sun. Jun 14th, 2026
    Raigad News: अलिबागला जाताना सावध व्हा! ‘या’ पुलाचे खांब झाले जीर्ण, लोखंडी सळ्या बाहेर, प्रवाशांचा जीव धोक्यात…

    Mandwa jetty bridge: मुंबई-अलिबाग जलमार्गावरच्या मांडवा जेट्टीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पुलाचे खांब जीर्ण झाले आहेत आणि सिमेंट गळून लोखंडी सळया बाहेर येत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

    गेटवे ऑफ इंडिया, मुंबई आणि अलिबाग-मांडवा यांना जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आता प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. मांडवा जेट्टीवरील पुलाचे खांब जीर्ण झाल्याने आणि सिमेंट गळून लोखंडी सळया बाहेर आल्याने हा पूल कधीही कोसळू शकतो. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात, मात्र महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टने बांधलेली ही जेट्टी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे धोक्यात आली आहे.

    मांडवा जेट्टी हा मुंबई- अलिबाग जलमार्गाचा मुख्य दुवा आहे. दररोज हजारो पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि व्यावसायिक या मार्गाचा वापर करतात. पावसाळ्यात (२५ मे ते ३० ऑगस्ट) ही सेवा बंद असते, पण सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. अलिबाग, मुरुड, काशीद आणि श्रीवर्धनला येणारे पर्यटक वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी या जलमार्गाचा उपयोग करतात. मात्र, जेट्टीवरील जीर्ण खांबांमुळे आता प्रत्येक प्रवास जीवावर बेतत आहे.

    MOA Election: अजित पवार VS मुरलीधर मोहोळ वाद उफाळण्यापूर्वीच संपला, दोघांना महत्त्वाची पदं

    सध्या मांडवा जेट्टीवर प्रवाशांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा नाही. पावसात भिजत आणि उन्हात ताटकळत प्रवाशांना बोटींची वाट पाहावी लागते. पत्र्यांच्या शेडवरील लोखंडी पत्रे गंजल्याने काढण्यात आले आहेत, तर नवीन पत्रे बसवण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वाऱ्यामुळे काही पत्रे सैल पडून प्रवाशांच्या अंगावर पडण्याचीही भीती आहे.

    जेट्टी ते वाहनतळ या अंतरावर दिव्यांग, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी फक्त एक-दोन वाहनांचीच व्यवस्था आहे, जी अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना सामानासह चालत जावे लागते. जेट्टीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. प्रवाशांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. शौचालयाची सोय नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांनाच गैरसोय होते. आजारी रुग्ण, स्तनदा माता आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय नसल्याने चढ-उतार करणे कठीण झाले आहे. बसण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांसाठी कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरोदर व आजारी प्रवासी उभे राहून त्रास सहन करत आहेत.

    या गैरसोयींमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिक आरोप करत आहेत की, “संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन स्थिती पाहत नाहीत.” मंत्री, आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी जेट्टीवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने येतात. यामुळे जेट्टीवरील संरचनेवर ताण वाढून दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वाहनांवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी केली आहे.
    मांडवा जेट्टी ही केवळ अलिबाग पर्यटनाची जीवनरेखा नसून कोकण किनाऱ्याशी मुंबईला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, ढिसाळ देखभाल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या जलमार्गावर प्रवास करणे आज प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे. पर्यटक विचारत आहेत, “प्रशासनाने आता तरी जागे होऊन, या जेट्टीची दुरुस्ती आणि सुविधांची सुधारणा केव्हा करणार?”

    मांडवा जेट्टीची सद्यस्थिती पाहता तातडीने उपाययोजना न केल्यास, ही जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळून मोठा जीवितहानीचा प्रसंग घडू शकतो. महाराष्ट्र सागरी मंडळाने त्वरित लक्ष घालून काम सुरू केले नाही, तर ‘कोकण पर्यटनाचा प्रवेशद्वार’ असलेला हा जलमार्ग काही काळातच इतिहासजमा होण्याची भीती नागरिक आणि पर्यटक व्यक्त करत आहेत.

    या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रविण पाटील यांनी सांगितले, “मांडवा जेट्टीचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून करण्यात आले असून, दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. टेंडर प्रक्रिया सुरू असून लवकरच काम हाती घेतले जाईल. जेट्टीवरील पत्र्यांच्या शेडचे काम ‘रेमंड कंपनी’मार्फत सुरू आहे, परंतु पावसामुळे ते संथगतीने चालू आहे.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed