newcomer fisherman dies: रायगडच्या रेवदंडा किनाऱ्यावर आलेल्या एका नवख्या मच्छिमाराचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. सर्वात दुःखद बाब म्हणजे या मृत पावलेल्या युवकाचा कामावरचा पहिलाच दिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गौतम हा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तो नुकताच कामासाठी रेवदंडा येथे आला होता. ‘जय भवानी’ या मच्छिमारी बोटीवर रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला. ३१ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप, राहुल कुमार रामसुंदर गौतम आणि इतर सहकारी खलाशी मासेमारीसाठी रेवदंडा बंदरातून समुद्रात निघाले होते. समुद्रात जाण्यापूर्वी त्यांनी बंदर परिसरात थोडा वेळ पार्टी केली होती.
MOA Election: अजित पवार VS मुरलीधर मोहोळ वाद उफाळण्यापूर्वीच संपला, दोघांना महत्त्वाची पदं
बोट खाडीमार्गे समुद्रात पोहोचल्यानंतर सर्वजण जेवणासाठी बसले होते. त्यावेळी प्रदीप अचानक गायब झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने समुद्रात आणि किनाऱ्यावर त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात प्रदीपच्या बेपत्ता असल्याची नोंद (क्र. १३/२०२५) करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंग्रेनगर समुद्रकिनारी प्रदीपचा मृतदेह बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रेवदंडा सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर, प्रदीपच्या मृतदेहाला अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही घटना अपघाती बुडाल्याची असल्याचे सांगितले आहे. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा तपास अजूनही सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे रेवदंडा किनाऱ्यावर शोककळा पसरली आहे. स्थानिक मच्छिमार बांधवांनी नवीन कामगारांसाठी अधिक सुरक्षेची काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

