• Tue. Mar 10th, 2026

    Nagpur News: नातेवाईकाच्या शोकसभेतून घरी परतलेल्या आईबापावर स्वत:च्याच लेकावर अंत्यसंस्काराची वेळ, काय घडलं?

    Nagpur News: नातेवाईकाच्या शोकसभेतून घरी परतलेल्या आईबापावर स्वत:च्याच लेकावर अंत्यसंस्काराची वेळ, काय घडलं?

    Nagpur News: आई-वडील नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला गेले होते. घरात एकटा असलेल्या २३ वर्षीय लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    nagpur youth death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी नागपूर: गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिटणवीसनगर येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

    संकेत शत्रुघ्न मसराम (वय २३) असे मृताचे नाव आहे. तो मिहानमधील हेक्झावेअर कंपनीमध्ये कार्यरत होता. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संकेतचे वडील खासगी नोकरी करतात. २९ ऑक्टोबरला संकेतचे आई-वडील वर्धा जिल्ह्यातील आर्णी येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला गेले. संकेत घरी एकटाच होता. यादरम्यान संकेतने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    Maharashtra TimesNagpur Crime: भयंकर! कॉलेज प्लेसमेंटमधील कॉपीचा राग; 4 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकाला निर्घृणपणे संपवलं, घटनेनं नागपुरात खळबळ
    शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचे आई-वडील घरी आले. दरवाजा बंद होता. त्यांनी संकेतला आवाज दिला. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी दरवाजा तोडला असता संकेत गळफास लावलेला दिसला. त्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. एका शेजाऱ्याने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून पोलिसांनी संकेत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    कायमचा संपर्क तुटला
    संकेतचे आई-वडील आर्णीला पोहोचले. काही वेळाने त्यांनी संकेतच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आई-वडिलांनी त्याच्या मोबाइलवर चार ते पाच वेळा संपर्क साधला. व्यस्त असल्याने संकेत प्रतिसाद देत नसावा, असे आई-वडिलांना वाटले. शनिवारी घरी परतताच संकेत गळफास लावलेला दिसला. आई-वडिलांनी हंबरडा फोडला. संकेतचा संपर्क कायमचा तुटला.

    Maharashtra TimesNagpur News: उपराजधानीत २० दिवसांत चार मातामृत्यू; लता मंगेशकर हॉस्पिटलमधील घटना, काय कारण?
    तर दुसरीकडे, कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शेतकरी कृष्णा रावजी दवंगे (वय ४४) यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. सततच्या पावसामुळे मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने झालेल्या नुकसानीमुळे व्यथित होऊन त्यांनी हे पाऊल उचलले. पिशोर शिवारातील गट क्रमांक १५६मधील शेतातील झाडाला गळफास घेऊन दवंगे यांनी जीवन संपवले. दवंगे शुक्रवारी सकाळी ऊन पडले म्हणून मक्याची कणसे वाळवण्यासाठी शेतात गेले होते. तेथे गेल्यावर मक्याच्या कणसांना कोंब आलेले त्यांनी पाहिले. या नुकसानीमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दवंगे यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा