raj thackeray on eci: राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात EVM मशीनमध्ये होणाऱ्या कथित घोळ आणि मतचोरीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि निवडणुका वर्षभराने झाल्या तरी चालतील असं म्हटलं आहे.
दरम्यान, मनसेच्या या मेळाव्यात मतचोरी कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे. त्यासाठी इव्हिएम मशीनची माहिती असलेले दोन तज्ञ व्यक्ती या मेळाव्याच्या ठिकाणी बोलवले होते. त्यामध्ये अमित उपाध्याय आणि यक्षित पटेल यांनी व्यासपीठावरून प्रात्यक्षिक करुन दाखवलं. हे मशीन राहुल चिमनभाई मेहता यांनी बनवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आणलेल्या या दोन कार्यकर्त्यांनी आणलेलं इव्हिएम मशीन त्यांनी हॅक केलेलं होतं व त्यांनी असा दावा केला की, आम्ही आमच्याकडचं मशीन हॅक करु शकतो तर निवडणूक आयोगाचं मशिनही हॅक करता येणं शक्य आहे. यामध्ये मुख्यत: EVM आणि VVPAT मधल्या मतांमध्ये घोळ करता येतो, असं त्यांनी म्हटलं.
Solapur News: ‘कोण प्रणिती शिंदे?, त्या आमच्यासाठी चिल्लर’; शिवसेना उबाठाच्या बड्या नेत्याची टीका, सोलापूर मविआत चाललंय तरी काय?
प्रात्यक्षिकानंतर राज ठाकरे म्हणाले…
“अनेक वर्षे आपण हे ओरडून सांगतो आहोत की, लोक आपल्याला मतदान करत आहेत, पण या सगळ्या भानगडींमधून आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल मी काहीतरी कारणं देतोय, कारणाचं काय अख्खा देश बोंबलतोय, या प्रक्रियेतून सत्तेत यायचं, हवीतशी सत्ता राबवायची. आपण यांना काय सांगतोय, मतदार याद्या स्वच्छ करा,पाच वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत, अजून एक वर्ष लागलं तरी चालेल, मतदार याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या. त्यानंतर निवडणुकांमध्ये ज्याचा विजय होईल, पराभव होईल आम्हाला मान्य असेल. आज जे सत्तेवर आहेत, त्यांचा विजयही झाला तरी आम्हाला मान्य आहे. पण, या सगळ्या गोष्टी लपवायच्या, निवडणुका घ्यायच्या म्हणजे मॅच फिक्स आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी क्रिकेट मॅच फिक्सिंगचा दाखला देत क्रिकेटर्सवर जशी कारवाई होते, तशी इथे कोणावरच कारवाई होत नाही, असं म्हटलं आहे.
“आयोग काहीही कारणं देतं”
मतदान कक्षातील सीसीटीव्हीवरुनही राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरलं ते म्हणाले की, मतदार कोण आहेत आम्हाला माहिती आहे. यामध्ये प्रायव्हसीचं कारण देणं हा काय प्रकार आहे. यात काही अडचणचं नसावी, आयोगाकडून काहीही कारणं देणं सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय १ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
ते म्हणाले की मी या मोर्चाला लोकलने पोहोचणार आहे. तुम्हीही या, सुटी मिळत नसेल तर बॉसलाही घेऊन या त्याचंही एक मत आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय यापूढच्या काळात या सर्व घोळाची माहिती घरोघरी पोहोचवा, असं मार्गदर्शन त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात केलं आहे.

