• Sun. Mar 8th, 2026

    Raigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

    Raigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

    Raigad Politics: अलिबागमधील एका मारहाण प्रकरणाचा निकाल लागला आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले दिलीप भोईर व इतर २१ जणांना 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे शिंदेसेनेला राजकीय धक्का बसला असल्याची चर्चा आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड, अमुलकुमार जैन: अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे घडलेल्या १२ वर्षांपूर्वीच्या मारामारी प्रकरणाचा निकाल आज (गुरुवार) जिल्हा व सत्र न्यायालय, अलिबाग (रायगड) यांनी दिला. या प्रकरणात भाजपमधून काही महिन्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर यांच्यासह एकूण २१ आरोपींना सात वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

    काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम आणि त्यांच्या साथीदारांना नोव्हेंबर २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा सभापती असताना पोलीस कोठडीत जाणारे भोईर हे रायगड जिल्हा परिषदेचे पहिले सभापती ठरले होते.
    Maharashtra TimesRaj Thackeray: मतचोरी नेमकी कशी होते? राज ठाकरेंनी दाखवलं प्रात्यक्षिक, EVM आणि VVPAT द्वारे घोळ होत असल्याचा दावा
    ११ सप्टेंबर २०१२ रोजी चोंढी येथे किरकोळ वादातून काँग्रेसचे विजय थळे, त्यांच्या पत्नी रूपाली थळे आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना शेकापचे दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पावणेदोन महिने दिलीप भोईर उर्फ छोटम हे पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर छोटम जिल्हा न्यायालयाला शरण आले होते. जिल्हा न्यायालयाचे तत्कालीन सत्र न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्यासमोर सभापती छोटम आणि त्यांचे सहकारी मकरंद भोईर, विक्रांत कुडतरकर, विवेक कुडतरकर, शिशिर म्हात्रे, संतोष साळुंखे, जयवंत साळुंखे हजर झाले. या सातही जणांचा अटकपूर्व अंतिम जामीन न्यायालयाने फेटाळला होता.

    सेशन केस क्र. ७८/२०१३ मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निकालानुसार दोषी ठरलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर, विक्रम वामन साळुंखे, विक्रांत विश्वनाथ कूडतरकर, मकरंद रविंद्र भोईर, विकेश वसंत ठक्कर, भरत अभिमान्य खळगे, गणेश रमेश म्हात्रे, संतोष वामन साळुंखे, सज्जाद शगीर मूल्ला, गणेश बळीराम भोईर, विवेक विश्वनाथ कूडतरकर, शिशिर शंकर म्हात्रे, हेमंत अनंत केळकर, जयवंत शामराव साळुंखे, विरेश रमेश खेडेकर, प्रभाकर रामचंद्र गवाणकर, प्रसाद दत्ता शिवदे, अशोक शांताराम थळे, मनोज जगन्नाथ थळे, राजेंद्र काशिनाथ ठाकूर व विजय राजाराम ठाकूर या २१ जणांना शिक्षा करण्यात आली आहे.

    दरम्यान, या प्रकरणातील चार आरोपी नितेश सुनिल गुरव, सूजित सदानंद माने, गणेश सोपान साळुंखे व उमेश शांताराम खेडेकर यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप भोईर यांच्यावर हाफ मर्डर, मारहाण व गुन्हेगारी कृत्याचे कलमांखाली गुन्हे दाखल होते. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे भोईर यांचे आगामी निवडणुकांमधील उमेदवारीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर भोईर हे स्थानिक राजकारणात प्रभावशाली मानले जात होते. मात्र, या निकालानंतर त्यांचा राजकीय प्रवास अडचणीत आला आहे.

    या निकालामुळे चोंढी परिसरात चर्चेला उधाण आले असून, शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर भोईर समर्थक आता पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    एकंदरीत, चोंढीतील १२ वर्षांपूर्वीचा वाद अखेर न्यायालयीन टप्प्यात निर्णायक ठरला असून, या निर्णयाने स्थानिक राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा