• Fri. Mar 20th, 2026

    सिंधुदुर्गचा अभिमान! नीतीआयोगाकडून जिल्ह्यातील AI मॉडेलचा सखोल अभ्यास सुरू – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 30, 2025
    सिंधुदुर्गचा अभिमान! नीतीआयोगाकडून जिल्ह्यातील AI मॉडेलचा सखोल अभ्यास सुरू – महासंवाद

    • नीती आयोगाचे शिष्टमंडळ जिल्हा दौऱ्यावर
    • पंतप्रधान कार्यालयास करणार अहवाल

    सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) : देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांचा समावेश आहे. विविध विभागांनी आपल्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) कसा प्रभावी वापर केला आहे, याची पाहणी आयोगाकडून करण्यात येत आहे.

    या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या डॉ देवव्रत त्यागी, श्रीमती विदिशा दास या सदस्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उप वनसंरक्षक मिलिश शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित‍ होते.

    यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनामध्ये AI प्रणालीचा समावेश करण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले प्रयत्नांविषयी शिष्टमंडळाला सविस्तरपणे  सांगितले.  ते म्हणाले  सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिलेला आहे. त्याअनुषंगाने AI प्रणाली प्रशासनात कशा प्रकारे अंतर्भुत करण्यात येईल याचा आम्ही अभ्यास केला आणि मे महिन्यापासून या प्रणालीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. AI प्रणालीच्या वापरामुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि गुणवत्ता येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती संकलित करुन मार्व्हल कंपनीशी समन्वय साधला आणि आज आम्ही या टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत. AI प्रणालीमुळे वेळ आणि पैशाची देखील बचत होणार आहे. निती आयोगाच्या दौऱ्यामुळे आमच्या प्रयत्नांना अधिक मुर्तरुप येणार असल्याचेही श्री राणे म्हणाले.

    जिल्हाधिकारी श्रीमती धेाडमिसे यांनी AI प्रणालीची पार्श्वभूमी आणि त्यावर करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.  त्या म्हणाल्या AI प्रणालीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत सर्व्हर रुम स्थापन करण्यात आले आहे. याव्दारे सर्व माहिती सुरक्षितरित्या जतन केली जाणार आहे. AI प्रणालीमुळे जिल्हा प्रशासन आणि इतर विभागांच्या कारभारात अचुकता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

    यावेळी निती आयेागाच्या शिष्टमंडळातील डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांनी प्रश्न विचारुन शंकांचे निरसर करुन घेतले. बैठकीच्या शेवटी डॉ. त्यागी यांनी AI प्रणालीच्या वापरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल पाहून पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान कार्यालय देशातील 10 जिल्हे हे AI मॉडेलव्दारे विकसित करणार आहे. या अनुषंगाने आमचे शिष्टमंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या AI प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी येथे आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि नागरिकभिमुख करण्याच्या दिशेने देशात नवा आदर्श निर्माण केला आहे. हा तंत्रज्ञानाधारित प्रयोग आता देशभरातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही श्री त्यागी म्हणाले.  नीती आयोगाचे सदस्य आज 30 आणि उद्या 31 ऑक्टोबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून AI कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करणार आहेत.या अभ्यास दौऱ्यानंतर नीती आयोगाकडून तयार करण्यात येणारा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयास सादर केला जाणार आहे.

    यावेळी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या AI प्रणालीची संपूर्ण माहिती व सादरीकरण आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, महिला व बालविकास विभाग, परिवहन विभागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात या विभागांमध्ये AI प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे. या विभागांच्या सादरकरणामधून शिष्टमंडळाने माहिती जाणून घेतली.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed