Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांत तीन हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. कबनूर येथे फायनान्स व्यवस्थापकाची बारमधील किरकोळ वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
बारमधील वाद, घरातून नेऊन हत्या
सोमवारी रात्री अभिनंदन कोल्हापुरे हे कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये मद्यप्राशन करत असताना वेटरशी त्यांचा किरकोळ वाद झाला. मात्र वातावरण काही काळाने शांत झाले. वादानंतर ते घरी परतले. थोड्याच वेळात पंकज चव्हाणसह तीन-चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी गेले. “बारमधील भांडणाचे स्पष्टीकरण आवश्यक असल्याने, पोलीस चौकशीसाठी अभिनंदनना घेऊन जातो,” असे सांगत त्यांनी अभिनंदन यांना मोटारसायकलवर बसवून मुख्य मार्गावर नेले. तिथे पेट्रोल पंपाजवळ दगड आणि सिमेंट पाईपने जबर मारहाण करुन ठार केले.
Satara News: डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, सरकारी वकीलांनी आज काय युक्तिवाद केला?
बराच वेळ झाला तरी अभिनंदन घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला व पंकज चव्हाणसह अन्य नावे न समजलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कबनूर व परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांचा तपास सुरू, हत्त्येचे कारण सापडले नाही
शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड, बिअरच्या बाटल्या मिळाल्या आहेत. बारमधील किरकोळ वाद हे हत्येचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध जोरात सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरील अविश्वासाची भावना वाढली आहे.
एका आठवड्यातच तिसरी हत्या, शिरोळ परिसर हादरला
शिरोळ तालुक्यात सोमवारी सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या करुन तरुणाचा मृतदेह दानवाड आणि एकसंबा दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलाजवळ टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. सकाळी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी नदीपात्राजवळ पडलेला मृतदेह पाहून तत्कालच पोलिसांना खबर दिली. सदलगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून प्राथमिक तपासाला सुरुवात केली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसर कर्नाटकाच्या सीमेजवळ असल्याने तपास महाराष्ट्र व कर्नाटकच्या पोलिसांकडून सुरू आहे. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर परिसरात आणि कृष्णा नदीपात्राजवळ झालेल्या दोन हत्यांच्या घटनांनंतर, या तिसऱ्या घटनेने संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान..
कोल्हापुरात ऐन दिवाळीच्या दिवसांत एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. आठवडाभरातील तिसऱ्या हत्येने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कबनूरच्या आणि दानवाड पुलाजवळ घडलेल्या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण आणखीन तणावपूर्ण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, परिसरात पोलिसांच्या पथकांकडून सखोल तपास सुरु असला तरी हे गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

