Bachchu Kadu Nagpur: शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले, “आम्ही देवेंद्रजींच्या घरी जाणार होतो, पण इथे रस्ता जाम आहे. आणि देवा भाऊंनी सांगितले की जेवणाची व्यवस्था नाही, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. मात्र, आम्ही सरकारला गेल्या आठ महिन्यांपासून सतत निवेदनं देत आलो आहोत. किमान १५ वेळा आम्ही सरकारसमोर मागण्या ठेवल्या, पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही.”
Parbhani News: काँग्रेसच्या परभणी ग्रामीणची धुरा बाबाजानी दुर्राणींकडे; राष्ट्रवादीला सुवर्ण दिवस दाखवणारे माजी आमदार काँग्रेसलाही सुगीचे दिवस आणणार?
ते पुढे म्हणाले, या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, मच्छीमारांसाठी, मेंढपाळांसाठी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही. पण आज अचानक बैठक बोलवली गेली, हे कस शक्य आहे? सरकारचं धोरणच शंका उत्पन्न करणारं आहे. मी फडणवीस साहेबांना निवेदन आणि मेसेज पाठवले. आम्ही आमचे मुद्दे ‘अ’ आणि ‘ब’ स्वरूपात मांडले आहेत. त्या मागण्यांवर निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आज नागपूर शहर जाम झालं आहे, त्याची तुम्हाला काळजी वाटते. पण आमचं आयुष्य जाम झालं आहे, त्याचं काय? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला ते दिसत नाही का? आम्हाला कोणत्याही नागरिकाला त्रास द्यायचा नाही, पण आमचं ऐकण्यासाठी सरकारला मजबूर करावं लागेल. कडू यांनी सांगितले की, आम्हाला जी जागा दिली ती आम्ही नाकारली आहे. आम्ही रस्त्यावरच थांबणार आहोत. आता आंदोलन पंजाबच्या धर्तीवर होईल. वर्ष लागले तरी आम्ही येथेच बसायची तयारी ठेवली आहे.
आमदार कडू यांनी आठवण करून दिली की, “आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून संघर्ष करत आहोत. पायदळ मोर्चा काढला, अन्नत्याग आंदोलन केलं, पण सरकारच्या कानावर काहीच पडले नाही. आज अचानक बैठक बोलवून सरकार आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आमच्या बावीस मागण्या आहेत, त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, योग्य हमीभाव देणे, दिव्यांग, मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा समावेश आहे. काही मागण्यांसाठी तर पैशांची गरजही नाही, फक्त परिपत्रक काढण्याची आवश्यकता आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
नागपूरमध्ये आंदोलन का केले, याबाबत ते म्हणाले, “सर्व आंदोलन मुंबईत का करायचे? नागपूरात देवा भाऊ आणि नितीन भाऊ आहेत. नागपूर हे देशाचं केंद्र आहे. आरएसएसचं मुख्यालय इथे आहे. त्यामुळे जर भाजपला नाही कळलं, तर संघाला तरी कळावं म्हणून आम्ही नागपूरातच आंदोलन करत आहोत.” बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यामुळे नागपूरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

