Nanded News : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असं म्हणत नांदेडमध्ये एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडली. या शेतकऱ्याने फावड्याने तहसीलदाराची गाडी फोडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
सोमवारी सकाळी मुदखेड तालुक्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शासकीय वाहनाने कार्यालयात पोहचले. कार्यालयातील आवारात चालकाने गाडी पार्किंग केली होती. मुदखेड तालुक्यातील वासरी येथील साईनाथ मारुती खानसोळे हा युवा तहसील कार्यालयात शासन अनुदानासाठी जाब विचारण्यासाठी आला होता. यावेळी कर्मचाऱ्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. पुन्हा तिच उत्तरं ऐकून साईनाथ खानसोळे हा संतप्त झाला आणि जय जवान, जय किसानचा नारा देत फावड्याने तहसील कार्यालयासमोर उभी असलेल्या गाडीची तोडफोड केली.
शेती मशागतीनंतर झाडाखाली बसली, पाणी पिताना अचानक…; लेकरांचं आईचं छत्र हरपलं, गावात हळहळ
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अधिकारी मलिदा खात आहे, असा आरोप शेतकऱ्याने केला. व्यापारी साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी करत आहे. हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे, अशी नाराजी या शेतकऱ्याने व्यक्त केली. घटनेनंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. या घटनेने एकच खळबळ उडाली.
काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार
नांदेड जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे शेतीचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. 16 तालुक्यात एकूण 7 लाख 12 हजार 610 शेतकऱ्यांचे 6 लाख 46 हजार 214.6 हेक्टरवरील कोरडवाहू, 1842 हेक्टरवरील बागायती आणि 476.6 हेक्टरवरील फळबाग जमीनदोस्त झाल्या. एकूण 6 लाख 48 हजार 533.2 हेक्टरवरील शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालं. शासनाकडून दुसऱ्या टप्यात नांदेड जिल्ह्याला 553 कोटी 48 लाख 62 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असं सांगण्यात आलं होतं, पण अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी देखील अंधारात गेली. अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

