Samruddhi Mahamarg Shirdi Interchange : कोपरगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका समृद्धी महामार्गालाही बसला असून शिर्डी इंटरचेंजजवळील भराव ढासळला आहे. या महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र तरीही बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
शनिवारची रात्र कोपरगाव तालुक्यासाठी केवळ जनजीवन विस्कळीत करणारी ठरली नाही, तर महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर घाला घालणारी ठरली आहे. ‘विकास’ आणि ‘प्रगती’चे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या महामार्गाचा भराव, एकाच रात्रीच्या मुसळधार पावसासमोर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळला आहे. कोकमठाण शिवारात घडलेल्या या घटनेने समृद्धी महामार्गाच्या बांधकामातील ‘भोंगळ’ कारभाराचं आणि निकृष्ट गुणवत्तेचं पितळ उघडं पाडलं आहे.
मिठी नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर प्रवाशांना मोठा फायदा, कुठे असणार ब्रीज? वाहतूक कोंडी दूर होणार
एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून ‘जागतिक दर्जाचा’ महामार्ग उभारल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे निसर्गाच्या एकाच आघाताने महामार्गाच्या पायालाच सुरूंग लागला आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहापुढे महामार्गासाठी वापरलेला मातीचा आणि दगडांचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे किंवा प्रचंड प्रमाणात खचला आहे. या घटनेमुळे महामार्गाच्या या भागातील पायाच कमकुवत झाला असून, भविष्यात हा रस्ता कधीही खचू शकतो किंवा मोठा अपघात घडवू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण, त्यापूर्वीच मोठ्या भेगा, वास्तव पहाच
‘समृद्धी’चा भराव ढासळणं ही केवळ तांत्रिक चूक नाही, तर हे जनतेच्या सुरक्षिततेशी खेळणं आहे. या अत्यंत गंभीर घटनेने रस्ते विकास महामंडळाच्या कामावर आणि ठेकेदारांच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तातडीने महामार्गाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राच्या ‘प्रगती’च्या मार्गावर निर्माण झालेलं हे ‘संकट’ तातडीने दूर न केल्यास, भविष्यात मोठ्या आपत्त्यांना आणि जीवितहानीला सामोरं जावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

