• Sun. Jun 14th, 2026

    गरीबांचा जीवाला किंमत नाही का? रुग्णालयापासून केवळ 500 मीटरवर पडली होती वृद्ध महिला; 6 दिवसांनी उपचाराअभावी गमावला जीव

    गरीबांचा जीवाला किंमत नाही का? रुग्णालयापासून केवळ 500 मीटरवर पडली होती वृद्ध महिला; 6 दिवसांनी उपचाराअभावी गमावला जीव

    Nandurbar old woman death: शहादा तालुक्यातील रामभरोसे हॉस्पिटलमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल असलेली महिला रुग्णालयाबाहेर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला सहा दिवस पडून होती.

    महेश पाटील, नंदुरबार: शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, रामभरोसे हॉस्पिटलमधील निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यू झालेली महिला वय साधारण 50 ते 55 वर्षे होती आणि काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, तिच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे ती रुग्णालयातून परत घराकडे निघाली. दुर्दैवाने, ती केवळ पाचशे मीटर अंतरावर जाऊन बेशुद्ध अवस्थेत पडली. रस्त्याच्या कडेला सहा दिवसांपासून पडलेल्या महिलेच्या बाजूला कोणताही डॉक्टर किंवा रुग्णालय कर्मचारी आला नाही. नागरिकांच्या दुर्लक्षामुळे तिचा मृत्यू झाला.

    स्थानिकांनी सांगितले की महिलेची तब्येत गंभीर होती. अनेकांनी डॉक्टरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरीही डॉक्टरांनी कोणतीही मदत केली नाही. रस्त्याच्या कडेला पडलेल्या महिलेजवळून जाताना काही डॉक्टरांनी थांबून चौकशी देखील केली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

    Maharashtra Timesपायात चप्पल तशीच, चेहऱ्यावर चावा घेतल्याच्या जखमा; उल्हास नदीत तरुणाची बॉडी, गूढ सुटेना

    दोषी डॉक्टरांविरुद्ध कारवाई

    घटनेची माहिती मिळताच इन्कलाब फाउंडेशनने तात्काळ पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या प्रतिनिधी भारती पवार आणि संदीप राजपाल यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या घटनेबाबत दोषी डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, असेही सांगितले.

    गरीबांचा जीव एवढा स्वस्त आहे का?

    जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. घटनेमुळे संपूर्ण शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजी कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गरीबांचा जीव एवढा स्वस्त आहे का?” असा संतप्त सवाल इन्कलाब फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.

    भारती पवार, इन्कलाब फाउंडेशन, “महिलेच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी. हे प्रकरण केवळ दुर्लक्षाचं नाही, तर मानवी संवेदना हरवल्याचं उदाहरण आहे. आपण अशा घटनांमुळे समाजातहीती आणि असहिष्णुता वाढते हे मान्य करू नये,” असे मत व्यक्त केले आहे.

    Maharashtra Timesसाताऱ्यात डॉक्टर तरुणीने जिथं जीव दिला, त्या हॉटेलसमोरच आज मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ, नव्या वादाला तोंड फुटणार?
    संदीप राजपाल, इन्कलाब फाउंडेशन, “रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान आणि योग्य उपचार मिळणे हक्क आहे. आम्ही हा मुद्दा शेवटपर्यंत लढवणार आहोत. रुग्णालयाचे कर्मचारी, डॉक्टर किंवा प्रशासन यांना याचा गंभीर धडा शिकवला जाईल,” असे सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा