• Mon. Mar 9th, 2026

    दिल्लीवरुन ‘तो’ कॉल अन् CM पद गेलं; आता ‘दुसरे’ एकनाथ रडारवर? फडणवीसांनी दिलेला मेसेज चर्चेत

    ByMH LIVE NEWS

    Oct 25, 2025
    दिल्लीवरुन ‘तो’ कॉल अन् CM पद गेलं; आता ‘दुसरे’ एकनाथ रडारवर? फडणवीसांनी दिलेला मेसेज चर्चेत
    मुंबई
    मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्रिपदासाठी २०२९ पर्यंत तरी कोणतीही व्हॅकेन्सी नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केलं. फडणवीस भाजपचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून दिल्लीत जातील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या सगळ्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.२०२९ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर कायम असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष मेसेज दिल्याची चर्चा आहे. कारण सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या वर्तुळातील अनेकांना ‘मी पुन्हा येईन’ असं सांगत असल्याची माहिती आहे. आपल्या निकटवर्तीय नेत्यांना, प्रशासकीय वर्तुळातील काही बड्या अधिकाऱ्यांना शिंदे गेल्या काही दिवसांपासून आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत. मंत्रालयातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी ही गोष्ट खासगीत सांगतात.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं दिल्ली वाऱ्या करतात. आजही त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेलं विधान शिंदे यांच्यासाठी सूचक मानलं जात आहे. २०२९ पर्यंत तरी मुख्यमंत्री होण्याची संधी नसल्याचा मेसेज फडणवीस यांनी दिलेला आहे.

    दिल्लीतून एक कॉल अन् सीएमपद गेलं
    २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. खडसे मुख्यमंत्री होता होता राहिले. त्यावेळी वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी खडसेंना फोन करुन तुम्ही पुढील मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. त्यांना संभाव्य मंत्र्यांची यादी करण्याची सूचना दिली. मुंबईच्या उपमहापौर राहिलेल्या विद्या ठाकूर यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी राजनाथ सिंह यांनी खडसेंना सुचवलं. यानंतर खडसेंनी संभाव्य मंत्र्यांची एक यादी दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वाला पाठवून दिली होती.

    खडसे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची पूर्ण तयारी केलेली असताना संध्याकाळी त्यांना दिल्लीवरुन कॉल केला. तुम्ही मुख्यमंत्री होत नाहीत. तुमच्या जागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, असा आदेश त्यांना देण्यात आला. पुढे एकनाथ खडसे यांनी याबद्दल चौकशी केली. तेव्हा संघानं फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचं त्यांना समजलं. २०१४ मध्ये संघ फडणवीस यांच्या बाजूनं उभा राहिली. २०२४ मध्येही तेच घडलं.

    आपल्याला २०२२ ते २०२४ आणि त्यानंतर सत्ता आल्यास पुन्हा २०२४ ते २०२९ अशा साडे सात वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असं एकनाथ शिंदे खासगीत सांगतात. त्यामुळेच ते २०२४ मध्ये स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेसाठी महायुतीला बराच अवधी लागला. २०१४ मध्ये पक्षातील एकनाथांचा दिल्लीवरुन करेक्ट कार्यक्रम झाला. आता दुसऱ्या पक्षाचे एकनाथ हे फडणवीसांशी स्पर्धा करत आहेत. पण २०२९ पर्यंत मी कुठेही जाणार नाही, असं स्पष्ट करत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मेसेज दिलेला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed