काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निधी वाटपावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक आमदारांना 5 कोटींचा निधी दिला जात आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तीव्र टीका केली. “महायुती सरकारमधील पहिल्यांदाच निवडून आलेल्या सुमारे 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा आमदार निधी देण्यात आला आहे. एकीकडे राज्यातील आदिवासी विकास विभाग आणि मागासवर्गीय कल्याण विभागाचा निधी वळवला जात आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे, आणि दुसरीकडे सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात केली जात आहे. हे केवळ विरोधकांवर अन्याय नसून जनतेवरही अन्याय आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
“राज्य सरकारचा उद्देश सर्वांगीण विकासाचा नसून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने आमदारांना निधी वाटला जात आहे. विरोधी आमदार आणि त्यांच्या मतदारसंघाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
‘लाडकी बहिण’ या योजनेवर देखील त्यांनी सरकारला धारेवर धरले. “विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. पण आता या योजनेत घोटाळे उघडकीस येत आहेत. या योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सुरुवातीपासून पारदर्शकता का ठेवली नाही? आता सरकारला या योजनेचा आर्थिक भार जाणवतोय म्हणून नव्या अटी-शर्ती घालण्यात येत आहेत,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
“नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर सरकार ही योजना बंद करणार आहे. आज मंत्री कितीही आश्वासनं देत असले तरी निवडणुका संपताच लाडकी बहिण योजना थांबवली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होणार का? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होती. तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी. स्थानिक निवडणुकांमध्ये आघाड्या स्थानिक पातळीवर ठरवल्या जातील. नव्या पक्षांच्या प्रवेशाबाबत निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

