Bhushan Patange, Raigad Crime: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर निमोनिया व श्वसन संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण पतंगे हा बनावट नोटा प्रकरणातील संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात होता. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी “पोलिस मारहाणीत मृत्यू झाला” असा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी शवविच्छेदनाची जबाबदारी मुंबईतील जेजे रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांकडे सोपविण्यात आली होती.
हुबळी एक्सप्रेस दगडफेक प्रकरण: अल्पवयीन आरोपीस अटक, पोलिसांच्या चोख कामगिरीचं प्रवाशांकडून कौतुक
शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, पतंगेच्या शरीरावर कोणतीही बाह्य मारहाणीची जखम, हाडे मोडल्याचे किंवा आतून रक्तस्रावाचे चिन्ह आढळले नाहीत. उलट, त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये सूज आणि संसर्गाचे (इन्फेक्शन) प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळले. तज्ज्ञांच्या मते, पतंगे काही दिवसांपासून निमोनियाने त्रस्त होता आणि संक्रमणामुळे त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने त्यास व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. परिणामी, त्याच्या हृदयावर ताण येऊन मृत्यू झाला असावा.
डॉक्टरांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, “मृतदेहावर कोणतीही मारहाणीची जखम आढळलेली नाही. मृत्यूचे कारण निमोनियामुळे झालेलं श्वसनसंक्रमण आहे.”
कुटुंबियांकडून तक्रार नाही
विशेष म्हणजे या प्रकरणात, पतंगेच्या कुटुंबीयांकडून पोलिसांविरोधात कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. प्राथमिक चौकशीतही त्यांना वैद्यकीय तपासणी अहवालाबाबत समाधान असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे या घटनेला अधिकृतरीत्या स्वाभाविक मृत्यू मानण्यात येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, पोलिस विभागानेही या निष्कर्षाचं स्वागत करत सांगितलं की, “आमच्यावरचे सर्व आरोप निराधार होते. वैद्यकीय अहवालाने सत्य स्पष्ट केलं आहे.”
भूषण पतंगे मृत्यू प्रकरणाने रायगड जिल्ह्यात मोठं वादळ उठवलं होतं. मात्र, जेजे रुग्णालयाचा सविस्तर प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर परिस्थितीत स्पष्टता आली आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
अहवालानुसार मृत्यूचं खरं कारण निमोनिया आणि संक्रमण असून, पोलिस मारहाणीचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. यामुळे पतंगे प्रकरणात दोन दिवस पोलिस अधिकारी कर्मचारी हे प्रचंड तणावाखाली आले होते. मात्र आता पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

