NCP Ajit Pawar: सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले आहे. कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि प्रफुल्ल पटेल यांच्या टिप्पणीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यावर गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात फारसे येत नसल्याची तक्रार गोंदियातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच पक्षनेतृत्वाकडे केली जात होती. काही दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही जाहीरपणे या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अखेर बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असून आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेत असल्याचं बाबासाहेब पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे चालताना प्रॉब्लेम येत असल्याने लांबचा प्रवास शक्य होत नसल्याने मी ही जबाबदारी सोडत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
विदर्भात भाजपनेही केले होते फेरबदल
जिल्ह्यात वेळ देत नसल्याच्या कारणातून भाजपनेही काही दिवसांपूर्वी पालकमंत्रिपदी फेरबदल केले होते. मंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. संजय सावकारे यांच्याबाबत जिल्ह्यातील पक्षसंघटनेत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, भाजपनंतर आता राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या पालकमंत्रिपदीही फेरबदल करण्यात आल्याने जिल्ह्याला वेळ न दिल्यास पद सोडावं लागेल, अशा इशाराच सत्ताधारी महायुतीतील पक्षांनी आपल्या पालकमंत्र्यांना दिल्याचं दिसत आहे.

