• Fri. Mar 6th, 2026

    Raigad News : महिला-बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन माता, आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये ९ महिन्यात तब्बल…

    Raigad News : महिला-बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन माता, आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये ९ महिन्यात तब्बल…

    Raigad Aaditi Tatkare News : रायगड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या नऊ महिन्यांत २१ बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या घटनांवरून ग्रामसेवक, महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप आहे. आकडा किती जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड , अमुलकुमार जैन : “कायदे असूनही जर अंमलबजावणी नसेल, तर ती केवळ कागदोपत्री व्यवस्था ठरते”, याचा स्पष्ट प्रत्यय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्हा रायगडमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. राज्यभरात महिला सक्षमीकरणाच्या गाजावाजा होत असतानाच, रायगड जिल्ह्यात बालविवाहाचे थैमान सुरू असून, गेल्या ९ महिन्यांत तब्बल २१ बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याहून धक्कादायक म्हणजे, ३४८ अल्पवयीन मुलींच्या मातृत्वाच्या नोंदी जिल्हा सामान्य रुग्णालयात झाल्या आहेत.

    कायद्यानुसार मुलींसाठी किमान विवाह वय १८ वर्षे असावे लागते, मात्र रायगडमधील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे विवाह सर्रास लावले जात आहेत. या वाढत्या घटनांवरून ग्रामसेवक, महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप केला जात आहे. महिला व बालविकास मंत्रालयाच्या सर्वात वरिष्ठ मंत्र्यांचा जिल्हा असूनही अशा घटना घडतात यावरून व्यवस्थेचा ढिसाळपणा उघड होतो. बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम, आई व बाळाच्या आरोग्याला गंभीर धोका, शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ, आयुष्यभर आर्थिक व सामाजिक दुर्बलता, आदी धोके उद्भवत असतात.
    Maharashtra TimesRaigad Crime : 60 टक्के परतावा देण्याचं आमिष, कोट्यावधींचा घोटाळा, 100हून अधिक महिलांना लुबाडलं; रायगडमध्ये खळबळ
    “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या सन्मान निधी वाटपाच्या गाजावाजात महिला सक्षमीकरणाची ग्वाही दिली जाते.मात्र तटकरे यांच्या जिल्ह्यातच जर बालविवाह थांबत नसतील, तर ही योजना आणि धोरणं केवळ कागदावरच प्रभावी ठरत आहेत का, हा सवाल आता उभा राहतो. स्त्री-सन्मान, आरोग्य आणि बालपण वाचवण्यासाठी केवळ योजना नाही, तर जागृत आणि जबाबदार अंमलबजावणी हवी, असं सामाजिक कार्यकर्त्या रूपाली भाटे म्हणाल्या.
    Maharashtra TimesRaigad News: करणीच्या संशयातून अख्खं कुटुंब टाकलं वाळीत, बहिष्काराचे नियम पाहून बसेल धक्का; ३३ जणांवर गुन्हा दाखल—–
    “चार तालुक्यांत ग्रामसेवकांना कायद्याचे प्रशिक्षण दिलं आहे. उर्वरित भागात पावसाळ्यानंतर मोहीम राबवली जाईल.”
    श्रीकांत हाबळे .महिला व बालविकास अधिकारी, रायगड
    बालविवाह का थांबत नाहीत?
    गरिबी व स्थलांतर
    अंधश्रद्धा आणि सामाजिक दबाव
    मुलींच्या सुरक्षेची भीती
    शिक्षणाचा अभाव
    मुलींचा विवाह करून “जबाबदारी संपवण्याचा” अपप्रवृत्तीचा दृष्टिकोन अजूनही जिवंत आहे.
    —-
    जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोंदी (2024-25):
    2024 मध्ये – 237 अल्पवयीन मातृत्व नोंदी
    2025 (सप्टेंबरअखेरपर्यंत) – 111 अल्पवयीन मातृत्व नोंदी
    —–
    बालविवाहाचे ‘हॉटस्पॉट’ — रायगडातील १३ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद
    पोलीस ठाणे गुन्ह्यांची संख्या
    तळा 4
    रोहा 3
    कोलाड, वडखळ, पोयनाड- प्रत्येकी 2
    पाली, मांडवा, म्हसळा, रसायनी, मुरुड, अलिबाग, नागोठणे, महाड उपविभाग- प्रत्येकी 1

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा