Farande Baba Prophecy : महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकारणात पडद्यामागे मोठ्या घाडमोडी घडत आहेत. या दरम्यान राजकारण आगामी काळात कसं असेल याबाबत फरांडे बाबा यांनी भाकणूक दिली आहे.
परंपरेनुसार ही प्रसिद्ध यात्रा दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील मृग नक्षत्रावर भरते. देश-विदेशातून भक्त येऊन विठ्ठल-बिरदेवाचे दर्शन घेतात. या यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे फरांडेबाबांकडून केली जाणारी भविष्याबाबतची भाकणूक. फरांडेबाबा सलग 21 दिवस उपवास करुन पट्टणकोडोली दाखल झाल्यानंतर ही भाकणूक करतात., अशी माहिती मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.
यात्रेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
पट्टणकोडोलीतील विठ्ठल-बिरदेव यात्रा ही भक्तांच्या मनातील श्रद्धेचे केंद्र आहे. विठ्ठल म्हणजे भगवान विष्णू तर बिरदेव हे वीरभद्र, म्हणजे भगवान शंकराचे स्वरूप मानले जाते. भक्तांच्या कल्याणासाठी ही दोन्ही दैवते येथे स्थिरावल्याची आख्यायिका सांगितली जाते. काळाच्या ओघात भक्ताच्या माध्यमातून देवाकडून ‘भविष्यदर्शन’ घेण्याची परंपरा सुरू झाली. अंजन गावातील वाघमोडे घराण्यास या दिव्य कार्याचा मान मिळाला आहे. आजही या घराण्याचा वंशज खेळोबा वाघमोडे अर्थात फरांडेबाबा हा विधी पार पाडतात.
हेडाम नृत्याचा थरार
यात्रेदरम्यान पार पाडले जाणारे हेडाम नृत्य हे विशेष आकर्षण ठरते. आख्यायिकेप्रमाणे सांगितले जाते की, खेलोबा वाघमोडे यांनी देवदर्शन न झाल्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला; पण देवकृपेने त्याच्या हातात दुसरा खड्ग देत त्याला नवे जीवन देवांनी दिले. त्यानंतर खेलोबाने या दुहेरी तलवारींचा जो धार्मिक खेळ सादर केला, तोच आज प्रसिद्ध ‘हेडाम नृत्य’ म्हणून ओळखला जातो.
भाकणुकीतील संदेश
फरांडेबाबांच्या तोंडून प्रकटलेले वचन हे देवाचे आशीर्वचन मानले जातात. याच संदेशांना भाकणूक म्हणतात. यावर्षीच्या भाकणुकीत शेती, राजकारण, अर्थव्यवस्था व समाजजीवनाविषयी अनेक संकेत मिळाले.
- पर्जन्य : पुढील सात दिवसांत पाऊस होईल.
- बळीराजा : रोहिणी व मृग नक्षत्रातील पेरणी सुखकर होईल.
- धारण : पीकस्थिती दोन, सव्वादोन, अडीच अशी समाधानकारक राहील.
- महागाई : मिरची व इतर वस्तूंचे दर वाढतील.
- भूमाता : भारतीय लष्कराचे शौर्य जगभर तेज पसरवेल.
- आशीर्वाद : “नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन मेंढ्या राखीन” – भक्तीतील विनम्रतेचा संदेश.
- राजकारण : गोंधळ आणि उलथापालथीनंतर धर्म व भगव्याचे राज्य येईल.
- रोगराई : भक्तांची दुःखे आणि आजार निवळतील.
- कांबळा : “माझ्या गुरुचे चरण जो घरेल, त्याला मी कांबळ्याखाली घरेन” – भक्तीतील आसऱ्याचा संकेत.
दरम्यान, या पारंपरिक सोहळ्यावेळी मंदिर परिसर भंडाऱ्यामुळे पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाला होता. हजारो पारंपरिक पोशाख परिधान केलेले भक्त ओव्या म्हणत देवाच्या चरणी नतमस्तक झाले. अनेकांनी वर्षभराचे नवस फेडले. तर कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेचा गौरव वाढवणारी ही विठ्ठल-बिरदेव यात्रेतील भाकणूक यंदाही सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सार्थ ठरली आहे.

