Maharashtra Weather Update: मुंबईच्या कमाल तापमानात रविवारपासून वाढ होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. रविवारपासून आभाळही अधिक निरभ्र असल्याने उन्हाचा तडाखा थेट जाणवू शकेल, असा अंदाज आहे.
अखेर पाच महिन्यांनी पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, पावसाच्या माघारीसोबतच आता ऑक्टोबर हीटची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांनी शुक्रवारी असह्य उकाडा अनुभवला. येत्या आठवड्याभरात कमाल तापमानाचा पारा मुंबईत ३५ अंशांपर्यंतही जाऊ शकतो.
मालवणीतील पोलीस अधिकाऱ्यासह ३ अंमलदार निलंबित; ‘तो’ VIDEO व्हायरल झाल्यानंतर कारवाई, प्रकरण काय?
गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबलेला होता. दरवर्षी ५ ऑक्टोबरला खान्देशात प्रवेशणारा परतीचा मान्सून, यावर्षी १० ऑक्टोबरला प्रवेशला. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत नैर्ऋत्य मौसमी वारे देशाबाहेरही जातील अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईसह देशातून १५ ऑक्टोबरला मान्सूनचा माघारीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते.
लाडक्या बहिणींची दिवाळी गोड! सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, तब्बल ४१० कोटी मंजूर, कधी मिळणार?
मुंबईतून यंदा सर्वसाधारण ८ ऑक्टोबरऐवजी १० ऑक्टोबरला मान्सून बाहेर पडला. या मौसमात आत्तापर्यंत सांताक्रूझ येथे ३,०१२ मिलीमीटर, तर कुलाबा येथे २,२६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा ऋतू अधिकृतरित्या संपल्यानंतर १ ते १० ऑक्टोबरदरम्यान कुलाबा येथे ७२ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ३१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ७ आणि ८ ऑक्टोबरला २४ तासांमध्ये हलक्या सरींची नोंद झाली होती. मात्र सांताक्रूझ येथे गेल्या तीन दिवसांमध्ये पावसाची अजिबात नोंद झालेली नाही.
वातावरणात अजूनही आर्द्रता आहे. १० ऑक्टोबरला सकाळी कुलाबा येथे ८१ टक्के, तर सांताक्रूझ येथे ७२ टक्के आर्द्रता नोंदली गेली. तर सायं. ५.३० वाजता कुलाबा येथे ६०, तर सांताक्रूझ येथे ६१ टक्के आर्द्रता नोंदली गेली. यातच मुंबईचे कमाल तापमानही शुक्रवारी अधिक वाढले. सांताक्रूझ येथे ३३.७ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीच्या आसपास असले तरी आर्द्रता तसेच पूर्वेकडून वाहणारे वारे यामुळे मुंबईकरांची अस्वस्थता शुक्रवारी वाढलेली होती.
BMC Election : मनसेशी युती ठरली, मुंबईत जागावाटपाच्या बोलणीसाठी उद्धव ठाकरेंचे तीन शिलेदार, घोषणेचा मुहूर्तही निश्चित?
१० वर्षांतील मुंबईतील पावसाची माघार
२०२४ : १५ ऑक्टोबर
२०२३ : २३ ऑक्टोबर
२०२२ : २३ ऑक्टोबर
२०२१ : १४ ऑक्टोबर
२०२० : २८ ऑक्टोबर
२०१९: १४ ऑक्टोबर
२०१८: ६ ऑक्टोबर
२०१७: २४ ऑक्टोबर
२०१६: १४ ऑक्टोबर
२०१५ : १५ ऑक्टोबर

