• Thu. Mar 12th, 2026
    समाजसेवक राणा सूर्यवंशींवर सोलापूरमध्ये हल्ला, पोलिसांच्या तत्पर कारवाईचं कौतुक!

    महाराष्ट्रातील उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर सोलापूर दौऱ्यात जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी बोलेरो जीपमधून येऊन पिस्तुलं आणि धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे चारही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. राणा सूर्यवंशी यांच्या वाढत्या सामाजिक आणि व्यावसायिक कार्यामुळेच हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या संपूर्ण कारवाईत विशेष आयजीपी सुनील फुलारी आणि सोलापूर ग्रामीण एसपी अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

    महाराष्ट्रातील हजारो युवकांना आपल्या व्यावसायिक उपक्रमांद्वारे रोजगार उपलब्ध करून देणारे आणि सामाजिक कार्याद्वारे समाजात ठसा उमटवणारे उद्योजक व समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गडचिरोली परिसरात गेल्या काही वर्षांपासून त्यांनी केलेल्या व्यापक सामाजिक कार्यामुळेच हा हल्ला घडवून आणला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

    राणा सूर्यवंशी हे कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते. अलीकडेच त्यांनी खरेदी केलेल्या साखर कारखान्याच्या कामानिमित्त ते अक्कलकोटला गेले होते. परतताना त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांकडे पिस्तुलं आणि धारदार शस्त्रं होती. ते एमएच ४२ २४ २९ क्रमांकाच्या बोलेरो जीपमधून आले होते.

    पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात चार जण सहभागी होते — सचिन लाळू राठोड (मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण आणि कृष्ण फुलचंद पवार (दोघे वाज्जी कालवा तांडा येथील रहिवासी) तसेच अविनाश शिवाजी राठोड (बक्षी हिप्परगा तांडा येथील रहिवासी).

    माध्यमांशी बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले की, ते या प्रकरणाच्या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटले, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तपासात नव्या दृष्टीकोनांची उकल होते का याचाही आम्ही शोध घेत आहोत.”

    सामाजिक कार्यामुळे राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हा पहिलाच हल्ला नाही. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ते उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही राज्यभर सक्रिय आहेत. उद्योग आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात वाढत्या प्रभावामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

    घटनेच्या वेळी राणा सूर्यवंशी यांच्यासोबत असलेले पोलीस शिपाई वामन पिसे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला एका आरोपीला अटक करण्यात आली होती आणि आता उर्वरित तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

    या प्रकरणाचा तपास करण्यात आणि आरोपींना अटक करण्यात सोलापूर (ग्रामीण) एसपी अतुल कुलकर्णी आणि विशेष आयजीपी सुनील फुलारी यांनी दाखवलेल्या परिश्रमाचे कौतुक केले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed