• Mon. Sep 7th, 2026

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Oct 1, 2025
आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




मुंबई, दि. १:  विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हाने, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभुतपूर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले.

‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याच्या विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली. हा दिवस अखंड विश्वासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed