Sujat Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ‘भाजपसोबत युती अशक्यच…’, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
‘आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मजबुत पायाभूत रचना उभारण्यासाठी गाव, वॉर्ड, वस्त्या आणि तांड्यापर्यंत बूथ कमिटी उभारण्याचे धोरण आखण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या समन्वयावर भर देत केडर शिबिरे, निवडणूक तयारी सत्र यांचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. 2026च्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकांसाठी नोंदणी मोहिम 30 सप्टेंबरपासून सुरू होईल. अधिकाधिक पदवीधरांना मतदार प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आम्ही यशस्वी होऊ,’ असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
भय इथले संपत नाही, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, हजार जणांचे स्थलांतर
भाजपसोबत युती अशक्य कारण
युतीच्या राजकारणाबाबत बोलताना सुजात आंबेडकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “वंचित बहुजन आघाडी कधीही भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षांसोबत हातमिळवणी करणार नाही. यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष समाविष्ट आहेत. “आमचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक विरोध कायम असून, जे पक्ष भाजपसोबत जातील त्यांच्याशी आमची युती होणारच नाही,” असे ते म्हणाले.
युतीचा निर्णय स्थानिक समित्यांकडे
वंचितच्या संघटन रचनेनुसार युतीबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक समित्यांमार्फत घेतला जाईल. “जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जिल्हा समित्या, तर महापालिका व नगरपालिकेसाठी शहर समित्यांना निर्णयाचे अधिकार दिले जातील. स्थानिक परिस्थितीनुसार पक्ष संघटनेशी चर्चेअंती पुढील भूमिका ठरेल,” असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
रायगडमध्ये एसटी बस आणि पिकअप टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात, 10 वर्षाच्या मुलीसह 13 जण जखमी
पूरग्रस्तांना भेटून मदतीसाठी करणार पाहणी
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सुजात आंबेडकर यांनी केवळ राजकीय भूमिकाच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीवरही भर दिला. राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन शासनासमोर मांडण्याचा वंचित बहुजन आघाडीचा संकल्प आहे. “निवडणूक कितीही महत्त्वाची असली तरी सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आम्हाला मान्य नाही,” असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर संघटनात्मक बांधणी आणि समाजकारण या दोन्ही आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एक दमदार पर्याय म्हणून उभा राहील, असे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

