Kolhapur Child Dies after Falling into Drain : कोल्हापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन भाऊ खेळत असताना दोघेही पाण्याने भरलेल्या गटारीत पडले. त्यातील मोठ्या भावाचा करुण अंत झाला आहे. या घटनेनं कोल्हापुरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अहिल्याबाई होळकर नगर परिसरात ही दुर्घटना घडली. क्लास संपल्यानंतर घरी परतत असताना केदार मारुती कांबळे (वय 11) आणि त्याचा धाकटा भाऊ जेम्स (वय 8) हे दोघे सख्खे भाऊ रस्त्याशेजारी असणाऱ्या गटारीजवळून खेळत खेळत घरी परतत होते. त्याचवेळी पाण्याने भरलेल्या नालासदृश्य मोठ्या गटारीत त्या दोघांचा तोल जाऊन ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे गटार तुडुंब भरले होते आणि दोघे जवळपास 30 ते 35 फूट अंतरापर्यंत पाण्याबरोबर वाहत गेले.
Kolhapur News : ‘भाजपसोबत युती अशक्यच…’ वंचितच्या सुजात आंबेडकरांनी केलं स्पष्ट; पाहा काय सांगितलं कारण?
मुलांची आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीला धावले. काहींनी लाकडी फळ्या, सिमेंटच्या पत्र्यांनी पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा जोर इतका होता की, हाताशी काही साधनं नसल्याने मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात अडचणी येत होत्या. काही जणांनी अग्निशमन विभागाला कळवले. फुलेवाडी आणि टिंबर मार्केट येथून अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बचावकार्य राबविण्यात आले.
केदार आणि जेम्स या दोन्ही भावांना अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढून तातडीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मोठा भाऊ केदार याला शुद्ध नव्हती आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. धाकटा जेम्स याला वेळेवर दिलेल्या उपचारांमुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रणभिसे यांनी सांगितले.
भय इथले संपत नाही, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, हजार जणांचे स्थलांतर
अचानक घडलेल्या या अपघातामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. परिसरातील नागरिकांमधूनही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे नाले, गटारे तुडूंब भरुन वाहत आहेत. प्रशासनाने मुलांच्या सुरक्षेसाठी अशा धोकादायक भागात पालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उघडी गटारे व नाले त्वरित सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

