• Sat. Jun 13th, 2026

    Sambhaji Bhide: दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, आपली आणि आपल्या देशाची लायकी…; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    Sambhaji Bhide: दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, आपली आणि आपल्या देशाची लायकी…; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    Sambhaji Bhide News: सांगलीत नवरात्र उत्सवात संभाजी भिडे यांनी दुर्गामाता दौडीवेळी मार्गदर्शन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदुस्तान हा निर्लज्ज लोकांचा देश आहे, असं भिडे यांनी म्हटल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली : सांगलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “आपण गणपती उत्सव, नवरात्र यांचं वाटोळं करून टाकलं आहे. दांडिया खेळणे म्हणजे हिंदू समाज अजूनही आपला हांडगेपणा, नपुंसकपणा टाकून द्यायला तयार नाही, असं दिसत आहे,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.

    संभाजी भिडे हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता सांगलीत नवरात्र उत्सवात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. “दैवतांचा पूजा करणारा हिंदुस्तान हा जगाच्या पाठीवर क्रमांक एकचा गुलाम, लाचार, पारतंत्र्यात राहण्यात ज्यांना लाज वाटली नाही अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे. जगात एकूण 187 देश आहेत. यात आपली लायकी काय? आपल्या देशाची लायकी काय? संविधान. पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात संविधान, पण अरे काय संविधान? हिंदुस्तान म्हणजे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असंही ते म्हणाले.

    Maharashtra Times‘हॉटेल सोनीमधला डेटा काढायला लाऊ नको’, मेहबूब शेख यांचा गोपीचंद पडळकर यांना मोठा इशारा

    पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या पंधराव्यावर्षी विस्कटलेले नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. शिवाजी महाराजांची शपथ मनाशी धरून आपण आईच्या दारात आलोय. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेताना त्यांच्या अंतरकरणात जी ताकद होती, ती आम्हाला दे, अशी प्रार्थना आपण सगळ्यांनी आईकडे करुयात,” असं आवाहन भिडे यांनी केलं आहे.

    दरम्यान, संभाजी भिडे यांनी संविधान आणि नवरात्रीबद्दल केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा