Marathwada Rain: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. लातूरमधील औसासह उजनी आणि निलंगा या तालुक्यांतील, तसेच सोलापूरमधील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.
मराठवाड्यात एकूण ४८३ महसुली मंडळे असून, त्यापैकी ४५१ मंडळांत आत्तापर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. यात अनेक मंडळांत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी झाल्याने लाखो हेक्टरवरील शेतपिकांना, फळबागांना मोठा फटका बसला; तर अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर शेकडो जनावरे दगावली.
मराठवाड्यात ओला दुष्काळ? सलग दुसऱ्या दिवशी १२९ मंडलांत अतिवृष्टी, आतापर्यंत १० बळी
मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली, शिवाय ग्रामस्थांशी संवादही साधला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिवाळीपूर्वीच केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, ‘ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा’, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अतिवृष्टी व पुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते, त्याप्रमाणेच अतिवृष्टी, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल.’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील करंजा गावाच्या शिंदेवस्ती, करळे वस्ती परिसरात पाहणी केली. करळे वस्तीला भेट देण्यासाठी त्यांना होडीने प्रवास करावा लागला.
Solapur Flood: सोलापुरात ‘जलप्रकोप’! सीनेच्या महापुरात १२४ गावे बाधित, २९ गावांना पाण्याचा वेढा
दोन दिवसांपासून अतिवृष्टी
मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. तालुक्यातील माणके येथील मका उत्पादक शेतकरी राजेंद्र शिवराम पवार (वय ५५) पाऊस उघडल्यानंतर मंगळवारी पहाटे शेतातील मका पीक पाहण्यासाठी गेले होते. मात्र, पिकांची नासाडी बघून त्यांची शुद्ध हरपली. वडील घरी आले नसल्यामुळे त्यांचा मुलगा अंकुश पवार व जावई श्रीराम गायकवाड यांनी त्यांचा शोध घेतला असता राजेंद्र पवार शेतात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पवार यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे माणके परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

