• Sun. Mar 8th, 2026

    मराठवाड्यात ओला दुष्काळ? सलग दुसऱ्या दिवशी १२९ मंडलांत अतिवृष्टी, आतापर्यंत १० बळी

    मराठवाड्यात ओला दुष्काळ? सलग दुसऱ्या दिवशी १२९ मंडलांत अतिवृष्टी, आतापर्यंत १० बळी
     छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे. मंगळवारच्या सकाळच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत नांदेड वगळता अन्य सातही जिल्ह्यांतील १२९ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ५७ मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पूर आला आहे. बीड व धाराशिव जिल्ह्यांत पुरामध्ये अडकलेल्या ८०हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून, ३३७ जनावरे दगावले. गेल्या तीन दिवसांत दोन लाख हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची स्थिती आहे.जायकवाडीसह विभागातील ११ ही मोठ्या प्रकल्पांतून मोठा विसर्ग सुरू आहे. कुठे ना कुठे अतिवृष्टी होत असल्याने अनेक भागांत पूरस्थिती आहे. रविवारी मध्यरात्री ७५ मंडलांत अतिवृष्टी झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने मराठवाड्यात कहर केला. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत १२९ मंडलांत अतिवृष्टी झाली. यात बीड जिल्ह्यातील ५७, परभणी जिल्ह्यातील २२, धाराशिव जिल्ह्यातील २१, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२, लातूर १०, जालन्यातील ५, तर हिंगोली जिल्ह्यातील २ मंडलांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सातत्याने अतिवृष्टी होत आहे.

    नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखेला अटक, मनोज जरांगे समर्थक असल्याचा वाघमारेंचा दावा

    दहा जणांचा मृत्यू
    छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. छोटी-मोठी मिळून ३३७ जनावरे दगावले असून, आतापर्यंत १३९३ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.कुठे काय नुकसान ?
    बीड जिल्ह्यात येवलवाडी ते डोंगरी किन्हीदरम्यानचा पुल वाहून गेला
    शिरूर तालुक्यातील खोकरमोह येथील तलाव फुटला.
    मौजे पिठीघाट (ता. केज) येथील ४४२, गंगामसला (ता. माजलगाव) येथील ५००, आबेगावातील २१५ आणि सुरुमगावातील ४००, चिंचोली, हिंगणे (ता. बीड) येथील ५४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
    धाराशिव जिल्ह्यात वाणेगाव, परंडा येथील ३२ नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका करण्यात आली.
    लातूर जिल्ह्यातील शेडूळ येथील ४, तर जवळा बुद्रुक येथील २५ जणांना सुरक्षितस्थळी हलवले.
    विभागातील अनेक गावांना पुराचा वेढा
    दोन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
    गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील १ हजार १४० गावे बाधित झाले असून एकूण २ लाख २२ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. यात १०२३ हेक्टरवरील बागायत आणि ३८७ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला आहे.

    साडेतीनशे मंडलांमध्ये आतापर्यंत अतिवृष्टी
    ४८३ —मराठवाड्यातील एकूण महसूल मंडले
    ३५१ —आतापर्यंत अतिवृष्टी झालेली मंडले
    ५५ —यंदा आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांतील बळी

    सोलापूर जिल्ह्यात नागरिक अडकले
    भीमा आणि सीना नद्यांना पूर आल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांत पूर. अनेक नागरिक अडकले कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचा आदेश
    पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद
    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना फूड पॅकेट वाटणार

    ३५ मंडलांत अतिवृष्टी
    अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांतील ३५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद
    सीना, खैरी, ढोरा, नंदिनी यांसह स्थानिक नद्यांना पूर
    खरीप पिकांची वाताहत, घरे, रस्ते, पूल यांचे नुकसान
    मोहटादेवी गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे पुरामुळे नुकसान

    चार तालुक्यांना तडाखा
    जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव, पाचोरा आणि चाळीस तालुक्यांत पुरामुळे शेती, घरांमध्ये पाणी
    जिल्ह्यात चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पावसाची नोंद
    गिरणा धरणाचे दहा दरवाजे उघडले, २० हजार क्युसेकने नदीपात्रात विसर्ग
    दोन दिवसांत ७८६ घरांचे नुकसान; दोन जण मृत्युमुखी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed