• Sun. Mar 15th, 2026
    Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे चार बळी, 76 जनावरं दगावली; १८ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्याखाली

    Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला असून आतापर्यंत यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यातील १८ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असल्याने बळीराजावर संकट ओढावलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत ७५ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला असून, चार जणांचा मृत्यू झाला आणि ७६ जनावरे दगावली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मुंबईतून या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

    अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका

    अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क तुटला. धाराशिव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या २०० जणांची एनडीआरएफ आणि लष्कराने सुटका केली. चिंचोगील (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वीज पडून नांदेड जिल्ह्यात एका, तर लातूर जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. एक जण वाहून गेला. मराठवाड्यात १८ लाखांवर हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत.
    Maharashtra TimesMaharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज; कोकण, विदर्भ, मराठवाड्यात जोर वाढणार

    शेतकरी वाहून गेला

    जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा मंडलात आठ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. वरखेडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने स तीश मोहन चौधरी (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर आदी ठिकाणी सुमारे १५० जण पुरात अडकले होते. त्यांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. रूई येथील १३ जणांना नौकेद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, तर देवगाव येथील २८ जणांना हेलिकॉप्टरने सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. एनडीआरएफ, लष्कराचे पथक बचाव कार्य करत आहे. जिल्ह्यात आज, मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesNagpur Rain : अतिवृष्टीने शेकडो घरांचे नुकसान, 8 हजारहून घरं अंशत:, तर 132 घरं पूर्ण उद्ध्वस्त; नागपुरातील हृदयद्रावक चित्र

    लातूर जिल्ह्यात दोन बळी

    लातूर जिल्ह्यात सांगवी (ता. निलंगा) येथील अनिता मारुती राठोड (वय ३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. बावलगाव येथील एक जण जखमी झाले. काटेजवळगा (ता. निलंगा) येथे दयानंद संभाजी बोयणे (वय ४२) पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातील २० रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

    बीडमधील देविनिमगावमधील घरांत पाणी शिरलं, अनेक कुटुंबाचं नुकसान

    दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठड्यातील अहवालानुसार मराठवाड्यात १२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा