गोंदियात ओबीसींचा महाआक्रोश बघायला मिळाला. मराठा समाजाचा आरक्षणाचा नवा निर्णय रद्द करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे नेते एकवटलेले बघायला मिळाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करीत गोंदिया जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी रविवारी महाआक्रोश मोर्चा काढला. कुडवा नाका ते जयस्तंभ चौकादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. ‘जय ओबीसी, जय-जय ओबीसी’, ‘नवे पर्व- ओबीसी सर्व’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे…’, ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी वातावरण तापले होते. सकल ओबीसी समाजाने आंदोलनाची हाक दिल्यानंतर रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी समाजबांधव गोंदियाच्या कुडवा नाका परिसरात एकत्र आले.
काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान, आमदार परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार गोपालदास अग्रवाल या नेत्यांनीही हजेरी लावली. मान्यवरांनी संबोधित केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजतादरम्यान मोर्चा जयस्तंभ चौकाच्या दिशेने निघाला. आपल्या हक्कासाठी भरउन्हात सारेच चालू लागले.
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंवैधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत. याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावा, असा मागणीवजा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.
मागण्या काय?
सरकारने तत्काळ जातनिहाय जनगणना करावी.
५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे.
मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे.
२ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
नागपुरात १० ऑक्टोबरला महामोर्चा
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. हा समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत सकल ओबीसी संघटनांनी येत्या १० ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम ते संविधान चौकादरम्यान महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहनही मोर्चादरम्यान करण्यात आले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा